रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:32 IST2025-04-16T19:31:57+5:302025-04-16T19:32:36+5:30
निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे.

रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना
छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील मौजे कातपूर येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने अरण्यम घनवन प्रकल्प यशस्वीरीत्या साकारण्यात आला आहे. अवघ्या ४.२५ हेक्टर क्षेत्रात तब्बल १ लाख २७ हजार ५०० रोपांची वृक्ष लागवड करून एक देखणं जंगल येथे उभं राहिलं आहे. निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे.
सन २०२१ पासून सुरु असलेल्या या प्रकल्पामुळे कातपूर परिसरात जैवविविधतेचं नंदनवन फुललं आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरामध्ये वृक्ष लागवड करून पशुपक्षांसाठी अधिवास निर्माण करणे हा होता. झाडांची गर्द सावली, पक्ष्यांचा गानगोष्टींनी भरलेला आसरा आणि शुद्ध हवा उन्हाळ्याच्या तप्ततेतही या घनदाट हरित जंगलात मनाला उभारी देणाऱ्या या प्रकल्पाचं सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडलं. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, वुई फॉर एन्व्हायरमेंट सामाजिक संस्थेच्या मेघना बडजाते यांची उपस्थिती होती.
मियावाकी ते अरण्यम, दुर्मिळ वनस्पतींचा खजिना
नाविन्यपूर्ण प्रकल्पअंतर्गत तीन वर्षात जिल्हा प्रशासनाने जायकवाडी पाटबंधारे कॉलनीच्या उत्तर बाजूस नारळीबाग मौजे कातपूर येथे अरण्यम हे घनवन साकारले आहे. जपानी वैज्ञानिक अकिरा मियावाकी यांच्या तंत्रावर आधारित अरण्यम पद्धतीने सुमारे ३०९ स्थानिक व दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची येथे लागवड झाली आहे. त्यात अर्जुन, ब्रह्मवेली, तेजपत्ता, रुद्राक्ष, कृष्णकमळ, चाफा, लाल चंदन, साग, बदाम, जांभूळ, मोहगणी, ड्रॅगन फ्रुट अशा दुर्मिळ, औषधी व पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपयुक्त झाडांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २१.९६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये प्रत्येक रोपावर सरासरी १७२ रुपये खर्च आला. या गुंतवणुकीतून केवळ हिरवाईच नाही, तर भविष्यातील जैविक संपत्तीचाही पाया रचण्यात आला आहे.
संशोधन, पर्यटन आणि निसर्गसंवर्धनाचा त्रिवेणी संगम
या घनवनातून जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय जागरुकता, पक्षी अधिवास निर्मिती तसेच विद्यार्थ्यांसाठी संशोधन परिसर उपलब्ध झाला आहे. भविष्यात हे ठिकाण पर्यटनस्थळ, वृक्षप्रजाती संग्रहालय आणि पर्यावरण शिक्षण केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी संधी आहे. दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या वृक्षप्रजातींची जीन बँक या ठिकाणी तयार होत असून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना येथे वाव असणार आहे,असे सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे यांनी सांगितले.