Join us  

मुंबई इंडियन्सने अविश्वास दाखवलेल्या गोलंदाजाचा कहर; पहिल्या षटकात हॅटट्रिक अन् ८ फलंदाज पाठवले माघारी

Ranji Trophy 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३पूर्वी मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या जयदेव उनाडकटने ( Jaydev Unadkat) १२ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:00 PM

Open in App

Ranji Trophy 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३पूर्वी मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या जयदेव उनाडकटने ( Jaydev Unadkat) १२ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने तीन विकेट्स घेतल्या.  भारतीय संघाने ती मालिका २-० अशी खिशात घातली होती. आता उनाडकट रणजीमध्ये परतला असून तो सौराष्ट्रचे कर्णधारपद सांभाळत आहे. दिल्ली विरुद्ध सौराष्ट्रच्या सामन्यात उनाडकटने रणजीच्या ८८ वर्षांच्या इतिहासात जे कोणी करू शकले नाही ते केले. उनाडकटने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. दिल्लीचा एकही फलंदाज उनाडकटचा चेंडूचा सामना करू शकला नाही आणि संपूर्ण संघ १३३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

८ विकेट्ससह हॅटट्रिकजयदेव उनाडकटने १२ षटके टाकली आणि त्यात त्याने ३९ धावांत ८ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी या गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत दिल्लीच्या आघाडीच्या ३ फलंदाजांना खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. उनाडकटने पहिल्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ध्रुव शौरे, चौथ्या चेंडूवर वैभव रावल आणि पाचव्या चेंडूवर यश धुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  उनाडकट सौराष्ट्राचे पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. त्या काळात तो टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग होता. दिल्ली संघाचे बहुतांश खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले. अशा स्थितीत संघात असलेल्या फलंदाजांकडे उनाडकटच्या गोलंदाजीचे उत्तर नव्हते.

उनाडकटने हॅट्ट्रिकनंतर पुढच्याच षटकात आणखी २ बळी घेतले. त्याने २ षटकांत एकूण ५ विकेट्स घेतल्या.  उनाडकटने फर्स्ट क्लास कारकिर्दीत २१ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दिल्लीची अवस्था इतकी बिकट झाली होती की संघाच्या ६  धावसंख्येवर ५ विकेट पडल्या होत्या. संघाचे आघाडीचे 5 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतरही उनाडकट थांबला नाही. त्याने लक्ष्य, शिवांक वशिष्ठ आणि कुलदीप यादव यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवत अखेर एकूण ८ विकेट्स आपल्या नावावर केल्या. 

दिल्लीचा संघ अतिशय वाईट विक्रम नोंदवण्यापासून बचावला. प्रांशु वीरन आणि हृतिक शोकीन या दोघांनी रणजी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर दिल्लीला बाद होण्यापासून वाचवले. यापूर्वी २०१०-११ च्या मोसमात हैदराबादचा संघ राजस्थानविरुद्ध अवघ्या २१ धावांत ऑलआऊट झाला होता. दिल्लीकडून हृतिक शोकीनने सर्वाधिक ६८ आणि शिवांकने ३८ धावा केल्या. चिराग जानी आणि प्रेरक मंकड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :रणजी करंडकमुंबई इंडियन्सदिल्ली
Open in App