Join us  

भारतासाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती; तिसरी टी-२० लढत आज

विंडीजविरुद्ध मालिका वाचविण्यासाठी विजयाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 5:52 AM

Open in App

प्रॉव्हिडन्स : विंडीजविरुद्ध सलग तिसरा पराभव आणि पाच सामन्यांची मालिका गमविण्याची नामुष्की टाळायची झाल्यास टीम इंडियाला मंगळवारी येथे खेळल्या जाणाऱ्या ‘करा किंवा मरा’ अशा तिसऱ्या टी-२० लढतीत निर्धास्त होऊन खेळावे लागणार आहे.

येथील संथ खेळपट्टी भारतीय फलंदाजांची डोेकेदुखी वाढवीत आहे. त्यामुळे विजयासाठी अतिरिक्त १०-२० धावा काढण्यात दिग्गज फलंदाज सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरले. विंडीजने २०१६ ला भारताला टी-२० मालिकेत पराभूत केले होते. सध्या ०-२ ने माघारलेल्या भारताचा आणखी एक पराभव मालिका गमाविण्याचे कारण ठरू शकतो. त्यामुळेच पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याची आक्रमकता अवलंबावी लागेल.

ईशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव हे सुरुवातीला अपयशी ठरल्याने संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्यावर मधल्या फळीत दडपण आले. वर्माने मात्र हे दडपण झुगारून धावा काढल्या. आशिया चषकाआधी फलंदाजांना धावा काढाव्या लागतील, असे कर्णधार हार्दिकने पराभवानंतर म्हटले होते. फलंदाजी क्रम सहाव्या स्थानापर्यंत असल्याने अक्षर पटेलला पुन्हा संधी मिळू शकते. फॉर्ममध्ये असलेला कुलदीप यादव अंगठ्याला सूज आल्याने रविवारी खेळला नव्हता. तो तिसरा सामना खेळेल का, हे पाहावे लागेल. 

पूरनला कसे रोखणार? निकोलस पूरनला धावा काढण्यापासून रोखण्याचे आव्हान फिरकीपटूंपुढे आहे.  चहल आणि बिश्नोईचे चेंडू सहजपणे खेळून पूरनने धावा काढल्या. अक्षरला गोलंदाजीची संधी देण्यात आली नव्हती. पूरनला रोखण्यासाठी हार्दिक आणि अर्शदीप यांनादेखील घाम गाळावा लागेल. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने मोठ्या धावा मोजल्यामुळे त्याच्या जागी आवेश किंवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते. विंडीज संघ मालिका विजयापासून एक पाऊल दूर आहे. त्यांच्या आघाडीच्या फळीचे अपयश पूरनने धुऊन काढले. तो आणि शिमरोन हेटमायर भारतीय फिरकीपटूंवर तुटून पडतील. कर्णधार पॉवेलनेदेखील २०१६ नंतर मालिका विजय मिळविण्याची हातची संधी गमविणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
Open in App