icc odi world cup 2023 : तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने विश्वचषक उंचावला. मागील २० वर्षांचा बदला घेऊन टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला धडा शिकवेल, अशी भारतीय चाहत्यांना आशा असताना कांगारूंनी इतिहासाची पुनरावृत्ती केली. २००३ च्या अंतिम सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. तसेच यंदा देखील झाले अन् निकालही त्याला अपवाद ठरला नाही. कांगारूंनी ६ गडी आणि ४२ चेंडू राखून भारताचा दारूण पराभव केला. साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकल्यानंतर रोहितसेनेने उपांत्य सामन्यात देखील शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवणाऱ्या भारताला अंतिम सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, सामन्यानंतर नेहमीप्रमाणे भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. पण फायनलच्या सामन्यानंतर पहिल्यासारखा उत्साह, खेळाडूंचा जल्लोष काहीच नव्हते. विश्वचषक हातून निसटल्याची झळ भारतीय शिलेदारांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ड्रेसिंगरूममध्ये सन्नाटा पाहायला मिळाला. आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा किताब पटकावला खरा पण कोहलीच्या हास्यामागे निराशा लपली होती हेही खरं... अष्टपैलू रवींद्र जडेजाने किंग कोहलीला सुवर्ण देऊन त्याच्या खेळीला दाद दिली.
भारताचा विजयरथ रोखून ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं अन् भारतवासियांची हृदयं तोडली. ऑस्ट्रेलियाने तोंडचा घास पळवल्यानंतर टीम इंडियाला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह चाहते धीर देत आहेत. ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करून आपल्या संघाला सहाव्यांदा जग्गजेतेपद मिळवून दिले.
भारताच्या पदरी निराशा ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं... नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.