Join us  

मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात

irani cup 2024 : मुंबईच्या संघाची धुरा पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:34 PM

Open in App

irani cup 2024 mumbai squad : मुंबईचा संघ पुन्हा एकदा अनुभवी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. इराणी चषकासाठी मुंबईनेअजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवले आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांचाही संघात समावेश असेल. श्रेयसने दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता, तर शार्दुल दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. तर रहाणे नुकताच इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळून परतला आहे. त्यामुळे आगामी स्पर्धा या तिन्ही खेळाडूंसाठी महत्त्वाची असेल. रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबईचा सामना रेस्ट ऑफ इंडियाशी लखनौच्या इकाना स्टेडियमवर १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल.

विशेष बाब म्हणजे या सामन्यातून शार्दुल ठाकूर पुनरागमन करत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरवर या वर्षी जूनमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तो ३ महिने क्रिकेटपासून दूर राहिला. तो आता इराणी चषकासाठी उपलब्ध असेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितले. लवकरच संपूर्ण संघ जाहीर होईल असे अपेक्षित आहे.

मुंबईला 'अंजिक्य' ठेवण्यासाठी रहाणेदरम्यान, २०१५-१६ पर्यंत मुंबईने ४१वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. पुढील सहा स्पर्धांमध्ये संघाला पुन्हा ट्रॉफी जिंकता आली नाही. २०१६ आणि २०२१ मध्ये मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या वर्षी पुन्हा अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर पडला. त्यानंतर मुंबईने त्याला आपल्या रणजी संघाचा कर्णधार बनवले. रहाणेच्या नेतृत्वात संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव केला आणि मुंबईने ४२व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.  

तसेच श्रेयस अय्यरला सध्या सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तो दुलीप ट्रॉफीमध्ये दिसला होता. इराणी चषक आणि रणजी ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर श्रेयस आता भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल. बांगलादेशनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

टॅग्स :अजिंक्य रहाणेशार्दुल ठाकूरश्रेयस अय्यरमुंबई