Join us  

Asia Cup 2022: "तुम्ही म्हणत आहात की के.एल राहुलने खेळू नये?, सूर्यकुमार यादवने घेतली पत्रकाराची फिरकी

भारतीय संघाने हॉंगकॉंगचा पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 1:10 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील प्रत्येकी 1-1 संघाने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. ग्रुप ए मधून भारताने तर ग्रुप बी मधून अफगाणिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघाने बुधवारी हॉंगकॉंगला पराभूत करून ही किमया साधली आहे. भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई करून Super 4 मध्ये जाण्यापूर्वी आत्मविश्वास कमावला. के. एल राहुल व विराट कोहली हे फॉर्माशी झगडणारे फलंदाज हे चांगले खेळले. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना हाँगकाँगवर विजय मिळवला. सलग दोन विजयांसह भारत अफगाणिस्ताननंतर Super 4 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरला. 

दरम्यान, भारतीय संघाकडून या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वगळता प्रत्येक फलंदाजाला साजेशी खेळी करण्यात यश आले. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर के.एल राहुलने 39 चेंडूंत 36 धावांची संयमी खेळी करून भारताला चांगली सुरूवात करून दिली. तर सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूंत 68 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. 

सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्चाची खूप चर्चा रंगली आहे. पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर सूर्याने हसत हसत म्हटले, "तुम्ही म्हणत आहात की के.एल राहुलने खेळू नये?" सूर्यकुमारच्या या उत्तराने एकच हशा पिकला. "राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे, त्यालाही थोडा वेळ द्यायला हवा आहे. आमच्याकडे सध्या थोडा वेळ आहे. जोपर्यंत माझा संबंध आहे, मी नेहमी म्हणत आलो की मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. प्रशिक्षक आणि कर्णधाराला सांगितले आहे की, मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करेन", असे सूर्यकुमार यादवने अधिक म्हटले. 

भारताचा दणदणीत विजयहॉंगकॉंगच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सुरूवातीला भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करून डाव पुढे नेला. हॉंगकॉंगच्या गोलंदाजांची गती अतिशय धीमी असल्यामुळे रोहित, विराटसह के.एल राहुल यांना मोठे फटकेबाजी करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करून हॉंगकॉंगसमोर तगडे आव्हान उभे केले. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंत 68 धावांची ताबडतोब खेळी करून हॉंगकॉंगच्या गोलंदाजांना घाम फोडला.  तर विराट 44 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 42 चेंडूंत 98 धावांची भागीदारी नोंदवली. अखेर भारताने 40 धावांनी सामना आपल्या नावावर केला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022सूर्यकुमार अशोक यादवपत्रकारलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ
Open in App