Join us  

...तर कदाचित त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी होऊ शकणार नाही

आम्हांला वगळा- गतप्रभ झणी होतील तारांगणे, कपिलने स्वत:विषयी घडलेल्या गमतीवर स्वत:च्या फलंदाजीने चोख उत्तर दिले. फलंदाजाची सर्वात मोठी जबाबदारी धावा काढणे हीच असते हे दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 6:29 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड, सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

गडी बाद झाला की बाद झालेला फलंदाज आणि त्याला बाद करणारा गोलंदाज दोघेही आनंदी झाल्याचे फार कमी पहायला मिळते. रविवारी पाचव्या कसोटीत बेन स्टोक्स बाद होताच शार्दुल ठाकूर आणि बुमराह आनंदी होतेच, पण स्टोक्सदेखील हसत हसत माघारी फिरला. पण का? याविषयी एक किस्सा आठवतो...

कपिल देव खेळत असताना एक जोक प्रसिद्ध झाला. त्यावेळी एका पत्रकाराने कपिलला विचारले, ‘तुम्ही इतक्या वेगाने धावा का काढता.’ यावर कपिल यांचे उत्तर होते, ‘मी बाद होण्याआधीच धावा काढू इच्छितो.’ ही गंमत वाटत असेल, पण प्रत्येक फलंदाजाला असेच वाटत असावे. कपिलने धाडसाने हे सांगितले, इतकेच. १९९० ला इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती.  नऊ गडी बाद झाले होते. एडी हेमिंग्सच्या षटकात कपिलने अखेरच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले. फॉलोऑन तर टळला मात्र पुढच्या षटकात पहिल्याच चेंडूवर नरेंद्र हिरवानी बाद झाला. कपिलने स्वत:विषयी घडलेल्या गमतीवर स्वत:च्या फलंदाजीने चोख उत्तर दिले. फलंदाजाची सर्वात मोठी जबाबदारी धावा काढणे हीच असते हे दाखवून दिले.

आता तुम्हाला कळले असावे की, स्टोक्स का हसत होता. त्याने आपल्या रणनीतीनुसार फलंदाजी केली होती. फलंदाजीच्या भाषेत याला ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ असे म्हटले जाते. पण जेथे जोखीम आहे, तेथे बाद होण्याची ५० टक्के शक्यतादेखील असते. त्यामुळेच तो स्वत:वर हसत हसत बाहेर गेला. अलीकडे कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो हे ताबडतोब फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. ते गोलंदाजांवर वर्चस्व गाजवून खेळत असल्याने त्यांना स्वत:ची शैली बदलता येत नाही. त्यांना असे करण्यापासून रोखाल तर  कदाचित त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी होऊ शकणार नाही. अशावेळी खेळाडूंना त्यांच्याच पद्धतीने समजून घ्यावे लागते.

रवी शास्त्री यांनी म्हटलेच आहे की, ते कोच असताना ऋषभला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणायचे, ‘ऋषभ बऱ्याच दिवसांपासून तू वेगळा फटका मारलेला नाहीस!’ ऋषभ यावर खुश व्हायचा. मनासारखी फटकेबाजी करण्याचा परवाना मिळाला, असे त्याला वाटायचे. मैदानावर तो उत्कृष्ट कामगिरी करीत असे. यात ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय विजयाचाही समावेश आहे. ऋषभ आणि स्टोक्ससारख्या खेळाडूंमुळे कसोटी क्रिकेट आणखी रंजक बनले. या फलंदाजांना बचावात्मक करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना गमावल्यासारखे होईल.जीगर मुरादाबादी यांचा प्रसिद्ध शेर आहे. तो मी थोडा बदलून सादर करू इच्छितो... हमको ‘बदल’ सके ये ज़माने में दम नहीं, हमसे ज़माना खुद है, हम ज़माने से नहीं.

 

टॅग्स :भारतइंग्लंड
Open in App