भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खांदेपालट पाहायला मिळाली. माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचा अध्यक्षपदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ आज संपला. रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला. या तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे आता नवे खजिनदार आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्या हातात ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी असणार आहे.
सौरव गांगुलीचा 'डबल' गेम झाला! BCCI चं अध्यक्षपद गेलं अन् जय शाह अँड टीमने आणखी एक धक्का दिला
मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची BCCIच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेलार यांना BCCIच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
बीसीसीआयची नवी टीम
- अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
- सचिव - जय शाह ( गुजरात)
- उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
- खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)
- सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
- आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"