Join us  

"आम्हाला निर्णय घेताना..."; वर्ल्डकप फायनल मुंबईबाहेर नको म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCI चे प्रत्युत्तर

वर्ल्डकप फायनल कधीच मुंबईतुन दूर नेऊ नका, म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना बीसीसीआयने प्रत्युत्तर दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 4:04 PM

Open in App

Aditya Thackeray VS BCCI : भारताच्या वर्ल्डकप विजयाचा जल्लोष गुरूवारी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर व्हिक्ट्री परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये लाखो क्रिकेट चाहते जमले होते. भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर तब्बल आठ लाख क्रिकेटप्रेमी जमले होते. यावरुनच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला इशारा दिला होता. आता बीसीसीआयनेआदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर खरपूस समाचार घेत टीका केली होती. मुंबईकडून विश्वचषक फायनल कधीही हिरावून घेऊ नका, म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. मुंबईत टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे भव्य स्वागत हा बीसीसीआयसाठी देशाच्या आर्थिक राजधानीतून कोणत्याही मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना कधीही हिरावून न घेण्याचा संदेश आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांनी 'एक्स' वर, "कालचा मुंबईतील उत्सव हा देखील बीसीसीआयला एक मजबूत संदेश आहे की मुंबईकडून विश्वचषक फायनल कधीही हिरावून घेऊ नका, अशी पोस्ट केली होती.

२०२३ मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आयोजित करताना बीसीसीआयने अंतिम सामना मुंबईऐवजी अहमदाबादला घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यावरुनच आदित्य ठाकरेंनी बीसीसीआयवर निशाणा साधला होता. मात्र आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. महत्त्वाच्या फायनलचे आयोजन करताना बोर्ड एका शहरापेक्षा दुसऱ्या शहराला प्राधान्य देऊ शकत नाही, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.  

"महत्त्वाच्या फायनलचे आयोजन करताना बोर्ड एका शहरापेक्षा दुसऱ्या शहराला प्राधान्य देऊ शकत नाही. १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनाही कोलकातामध्येच झाला होता. त्यामुळे फायनल ठराविक शहरातच व्हावी, असे ठरवता येणार नाही. अनेक सेमीफायनल आणि फायनल मुंबईत झाल्या आहेत. तसेच, अहमदाबादच्या मैदानात १,३०,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घेताना  क्षमता देखील पहावी लागते. कोलकाता (ईडन गार्डन्स) ची प्रेक्षक क्षमता ८०,००० आहे. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. संपूर्ण देश आणि सर्व स्टेडियम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. तुम्ही फक्त एका जागेपुरते मर्यादित राहू शकत नाही," असे राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

"मुंबईकर त्यांच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी एकत्र आलेले पाहून आम्हाला खूप आनंद झाला. मुंबईला आमचे नेहमीच प्राधान्य असते. पण फायनल कुठे घ्यायची, सेमीफायनल कुठे घ्यायची हे संपूर्ण बीसीसीआय ठरवते. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. मुंबई नेहमीच आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असते. पण सर्व फायनल एकाच शहरात व्हायला हव्यात असे कोणत्याही देशात घडत नाही," असेही शुक्ला म्हणाले. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आदित्य ठाकरेबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ