Join us  

आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी! विराट फॉर्मात आला तसा गौतम गंभीरने मोर्चा कॅप्टनकडे वळवला

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:16 PM

Open in App

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. या विजयात विराट कोहली, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा सर्वात मोठा वाटा होता. विराटने ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकार मारत १६६ धावा केल्या. कोहलीला शुभमनची पूर्ण साथ मिळाली आणि त्यानेही वन डेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १३१  धावांची विक्रमी भागीदारी केली.  गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४  चौकार आणि २ षटकार खेचले. त्यानंतर सिराजने भेदक गोलंदाजी करून चार विकेट्स घेतल्या व श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी पाठवला. 

रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video 

विराटने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी करून टीकाकारांची बोलती बंद केली. त्यामुळेच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने आपला मोर्चा आता कर्णधार रोहित शर्माकडे वळवला. रोहितने कालच्या सामन्यात ४९ चेंडूंत ४२ धावा केल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अशा खेळपट्टीवर रोहितला सहज शंभर धावा करता आल्या असत्या, पण तो चुकला. रोहितला मागील ५० डावांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. यावरूनच आता गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. गंभीर म्हणाला की, रोहितलाही विराट त्याच जागेवर जावं लागेल.

गंभीर पुढे म्हणाला की,''विराटप्रमाणेच आपल्याला रोहितवरही टीका होण्याची गरज आहे. मागील तीन वर्ष विराटकडून शतक होत नव्हते, तेव्हा त्याच्यावर भरपूर टीका झाली. मग रोहितवरही प्रश्न उपस्थित करायला हवेत. कारण मागील ५० इनिंग्जमध्ये ( डाव) रोहितला शतक झळकावता आलेले नाही. ''

रोहितने पहिल्या वन डे सामन्यात ६७ चेंडूंत ८३ धावा केल्या ज्यात भारताने ६७ धावांनी विजय मिळवला. तिसर्‍या वन डेत रोहित चांगल्या लयीत दिसला पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. गंभीर म्हणाला की,''रोहित चेंडूला चांगले फटके मारत आहे पण त्याला २०१९च्या त्याच्या फॉर्ममध्ये परतावे लागेल. रोहितने २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ९ सामन्यांत ६४८  धावा केल्या होत्या आणि त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्या स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून 5 शतके झळकली.'' 

गंभीर म्हणाला की, ''जर तुम्ही एक किंवा दोन मालिकेत १०० धावा करू शकत नसाल तर ती वेगळी बाब आहे. पण रोहित ५० डाव हे करण्यात अयशस्वी झाला आहे. यावेळीही तो चांगल्या लयीत असूनही त्याला १०० धावा करता आल्या नाहीत. अशा स्थितीत रोहितला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आश्चर्यकारक कामगिरी करावी लागणार आहे. कारण वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची संपूर्ण जबाबदारी फक्त विराट आणि रोहितवर असेल.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मागौतम गंभीर
Open in App