Join us  

PCB vs BCCI: भारत सहभागी झाला नाही तरी आशिया कप पाकिस्तानातच व्हायला पाहिजे; युनूस खानने BCCIवर साधला निशाणा 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:01 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20  विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली. अशातच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. 

आशिया चषक पाकिस्तानातच व्हायला हवा - युनूस खान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला प्रत्युत्तर देताना जय शाह यांच्या विधानावर टीका केली आणि 2023 मध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी दिग्गज युनूस खानने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. युनूस खानने जय शाह यांच्यावर टीका करताना म्हटले, "जय शाह हे केवळ बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. पीसीबीने बीसीसीआयला जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवे. आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात खेळवली गेली पाहिजे. भारताने या स्पर्धेत सहभाग नाही घेतला तरी ही स्पर्धा पाकिस्तानात व्हायला हवी." 

भारताविरूद्ध एकही सामना खेळू नयेपाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्ध एकही सामना खेळू नये, असे एका कार्यक्रमात बोलताना युनूस खान म्हणाला. "मला वाटते की जय शाह यांनी असे बोलायला नको होते, पण आता गोळी झाडलीच आहे तर मी पीसीबीला याविरूद्ध कठोर भूमिका घेण्याचा सल्ला देईन. जे या आधी आपण केले होते तेच करायला हवे. जसे की न्यूझीलंडने यापूर्वी पाकिस्तान दौरा रद्द केला होता त्यानंतर त्यांनी पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास सुरूवात केली." अशा शब्दांत युनूस खानने बीसीसीआयवर टीका केली. 

जर बीसीसीआयने त्यांच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असेल. तर भारतीय संघ आशिया चषकात सहभागी होणार नाही, याला आमची हरकत नाही. त्यामुळे आम्ही देखील आगामी भारतात होणाऱ्या विश्वचषकाबद्दल विचार करणे सोडून दिले पाहिजे. याबाबत पीसीबीने विचार करू नये. भारत दौर्‍यावर किंवा आम्ही तटस्थ ठिकाणी आशिया चषकाची स्पर्धा आयोजित करण्यास सहमती देऊ नये. असे युनूस खानने अधिक म्हटले. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022बीसीसीआयपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App