Join us  

गौप्यस्फोट : विराट कोहली २०१६मध्ये MS Dhoni विरोधात रचत होता कट? रवी शास्त्रींनी परिस्थिती हाताळली अन्यथा... 

R Sridhar Book Controversy: विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी यांच्यातली बॉडिंग सर्वांनाच माहित आहे, पण २०१६मध्ये हे नातं तुटलं असतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 7:20 PM

Open in App

R Sridhar Book Controversy: विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी यांच्यातली बॉडिंग सर्वांनाच माहित आहे... महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाची यशस्वी वाटचाल विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या काळात कायम राखली. पण, २०१६मध्ये धोनीच्या विरोधात कोहली कट रचत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्याला कारण ठरतंय ते भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचे पुस्तक. विराट व धोनी ( Virat Kohli & MS Dhoni Relation) यांच्यातलं घट्ट नातं २०१६मध्ये तुटले असते असा दावा  श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात नोंदवेल्या घटनेवरून केला जात आहे. रवी शास्त्रींनी ( Ravi Shastri) त्यावेळेस विराटला समज दिल्याने परिस्थिती चिघळली नाही. 

श्रीधर यांच्या पुस्तकानुसार, २०१६ मध्ये विराटला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही कर्णधारपद हवे होते. तो कसोटीत कर्णधार बनला होता आणि त्याला धोनीकडून मर्यादित षटकांच्या संघाचेही नेतृत्व हवे होते. यानंतर रवी शास्त्रींनी त्यांचे आणि धोनीचे नाते तुटण्यापासून वाचवले.   श्रीधर यांच्या पुस्तकाच्या पान क्रमांक ४२ वर असे काही लिहिले आहे, ज्यामुळे धोनी आणि कोहली यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पुस्तकात लिहिले आहे की, “२०१६ मध्ये एक काळ असा होता जेव्हा विराट मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याने काही गोष्टी सांगितल्या ज्यावरून तो कर्णधारपदाच्या शोधात असल्याचे दिसून आले.''

या पुस्तकात पुढे लिहिले आहे की, धोनी आणि कोहली यांच्यातील कर्णधारपदाचा संघर्ष रवी शास्त्रीनेच संपवला. श्रीधरने लिहिले, “एका संध्याकाळी, रवीने विराटला फोन केला आणि म्हणाला, ‘हे बघ विराट, महेंद्रसिंग धोनीने तुला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद दिले. त्याचा आदर करायला हवा. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तो तुम्हाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी देईल. आता जोपर्यंत तुम्ही त्याचा आदर करत नाही, उद्या तुम्ही कर्णधार असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या संघाकडून सन्मान मिळणार नाही. आता काहीही झाले तरी त्याचा आदर करा. ते तुमच्याकडे येईल, तुम्हाला त्याच्या मागे धावण्याची गरज नाही. ”

विराटने हा सल्ला स्वीकारला आणि वर्षभरातच त्याला पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपदही मिळाले.विराट कोहलीने जानेवारी २०१७ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि २०२२ पर्यंत भारताचे नेतृत्व करत होता. २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराटने ट्वेंटी-२० कर्णधारपद आणि २०२२च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरवी शास्त्री
Open in App