Join us  

... तर तुम्ही स्वतःला फलंदाज म्हणवू नका; केपटाऊन कसोटीवरून सुनील गावस्करांचा संताप

भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 2:45 PM

Open in App

india vs South Africa 2nd Test: भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले. या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ गडगडला. केपटाउनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर भारताने प्रथमच यजमान आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडींमुळे हा सामना चर्चेत राहिला. त्यातीलच एक म्हणजे खेळपट्टी... होय, भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील यावरून संताप व्यक्त केला. तसेच खेळपट्टीवरून टीका करणाऱ्यांना रोहितने खडेबोल सुनावले.

भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी मात्र वेगळा मुद्दा मांडला. गावस्करांनी न्यूलँड्सच्या खेळपट्टीबद्दल बोलताना म्हटले, "अशा खेळपट्टीवर फलंदाजांची मोठी परीक्षा असते. न्यूलँड्सच्या या भेगा पडलेल्या खेळपट्टीवर आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करण्याचे मोठे आव्हान फलंदाजासमोर होते. कसोटी सामन्यांमध्ये खराब खेळपट्टीवर पराक्रम गाजवणं यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी करायला हवी होती."

तसेच मला प्रामाणिकपणे वाटते की, जर खेळाडू अशा कठीण खेळपट्टीवर चांगली कामगिरी करू शकत नसतील तर त्यांना बदलत्या परिस्थितीमध्ये आव्हानात्मक वाटते. वेगवान, जिथे चेंडू उसळी घेत असेल अशा खेळपट्ट्यांवर मैदान गाजवण्याचे सामर्थ्य एखाद्या खेळाडूमध्ये नसेल तर तो चांगला फलंदाज असू शकत नाही, असेही गावस्करांनी सांगितले. ते 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

कसोटी क्रिकेटमधून खूप काही शिकण्यासारखे असते असे गावस्करांनी नमूद केले. "कसोटी क्रिकेट हे असेच आहे, इथे तुम्हाला खूप काही शिकता येते. मला माफ करा, पण इथे जो चांगली कामगिरी करू शकत नाही तो उत्कृष्ट फलंदाज नाही... कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांची परीक्षा असते आणि या स्थितीत तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नसाल तर तुम्ही फलंदाज नाही. जो फलंदाज कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करू शकत नाही तो चांगला खेळाडू बनू शकत नाही. माध्यमांनी देखील याबद्दल लिहायला हवे. क्षमता आणि कामगिरीत सुधारणा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील हे क्षण अत्यंत महत्त्वाचे असतात", असेही गावस्करांनी सांगितले.

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ