नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या सामन्यांवर फोकस करण्याचे कारण देत अष्टपैलू हार्दिक पांड्या याने रणजी करंडकासाठी निवडण्यात आलेल्या बडोदा संघातून माघार घेतली आहे. १० फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडकासाठी बडोदा संघाची घोषणा करण्यात आली. केदार देवधरकडे नेतृत्व सोपविण्यात आले. विष्णू सोळंकी उपकर्णधार असेल.
- हार्दिक अनेक दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने टी-२० विश्वचषकात अखेरचा सामना खेळला होता. फिटनेसमुळे स्वत:ला निवडीपासून दूर ठेवल्याचे त्याने कारण दिले.- बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांआधी सांगितले होते की, हार्दिकला पूर्ण फिट होण्यासाठी ब्रेक देण्यात आला आहे, भारतीय संघासाठी त्याने दीर्घकाळ खेळावे हा हेतू असल्याचे सांगून रणजी करंडकाचे सामने हार्दिक खेळेल तसेच स्पर्धेत अधिक षटके गोलंदाजी करेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
- हार्दिक २०१९ ला इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे विश्वचषकापासून फिटनेसमुळे त्रस्त आहे. त्याने पाठीवर शस्त्रक्रिया केली, तरीही तो गोलंदाजी करण्याइतपत सज्ज होऊ शकला नाही. आयपीएलच्या मागच्या पर्वात त्याने गोलंदाजी केली नव्हती. - टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यातही तो गोलंदाजी करू शकला नव्हता. याच कारणास्तव त्याला राष्ट्रीय संघातील स्थान गमवावे लागले. नंतर मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले नव्हते. नवीन संघ अहमदाबादने मात्र त्याला १५ कोटीत स्वत:कडे घेतले शिवाय कर्णधारही नेमले.