बंगळुरू : यष्टीरक्षक वृद्धिमान साहा प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया सातत्याने येत आहेत. माजी दिग्गज यष्टीरक्षक- फलंदाज सय्यद किरमाणी यांनीही गुरुवारी धक्कादायक विधान केले. साहावर ज्याप्रकारे अन्याय झाला, तसाच अन्याय माझ्यावरही झाला; पण त्यावर त्यावेळी कोणीही बोलले नाही, असे किरमाणी यांनी म्हटले आहे.
१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य सय्यद किरमाणी म्हणाले, ‘साहाची स्थिती बिकट झाली. आयपीएल आणि मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी करणारे अनेक युवा खेळाडू आहेत. साहा दु:खी आहे; पण प्रत्येक क्रिकेटपटूला अशा प्रसंगातून जावे लागते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूंबद्दल काय विचार करतात, हे आम्हाला माहीत नाही. माझ्यावरही अन्याय झाला; पण त्यावर कोणी बोले नाही, बोलत नाही.’
वृद्धिमान साहाने भारतासाठी ४० कसोटींमध्ये ३ शतकांच्या मदतीने १३५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३० पेक्षा कमी राहिली आहे; पण त्याने ९२ झेल आणि १२ स्टम्पिंगसह यष्टीमागे १०४ बळी घेतले आहेत.