चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात अनेक गोष्टी चर्चेत आहेत. एका बाजूला भारतीय संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून गुणतालिकेत टॉपला जाणार का? हा मुद्दा चर्चेचा असताना रोहित शर्मा पुन्हा बाकावर बसल्याचे पाहायला मिळणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. अखेर यावर खरी गोष्ट समोर आली आहे. शुक्रवारी भारतीय संघातील विकेट किपर बॅटर लोकेश राहुल याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक गोष्टीवर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला आहे? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाच्या ताफ्यातील दुखापतीसंदर्भात काय म्हणाला के एल राहुल?
लोकेश राहुल याला भारतीय ताफ्यातील फिटनेससंदर्भातील मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, फिटनेससंदर्भात कोणतीही समस्या नाही. माझ्या माहितीनुसार, कोणी आगामी सामन्याला मुकणार नाही. आमच्यासमोर नवी आव्हाने असतील. त्यासाठी मानसिकदृष्ट्या आम्हाला सक्षम राहायचे आहे. आम्ही इथं स्पर्धेआधी एका आठवड्यापूर्वीच आलोय. त्यामुळे परिस्थितीची जुळवून घेणं सहज शक्य झाले. जो सेट होईल त्याने मैदानात थांबायचं हे आमच्यात ठरलंय, असा गेम प्लानही त्याने यावेळी शेअर केला. जर आमच्या हातात विकेट असतील तर ३५-४० अतिरिक्त धावा काढणे सोपे होईल, या रणनितीसह आम्ही मैदानात उतरतोय, असेही तो म्हणाला.
कुणालाच कमी लेखत नाही
तो पुढे म्हणाला की, आम्ही या स्पर्धेत कुणालाही कमी लेखत नाही. यंदाच्या हंगामात मी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा भाग आहे. हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. ही स्पर्धा वर्ल्ड कपसारखीच आहे. इथं प्रत्येक टीमचा सामना करावा लागतो. जर सुरुवात चांगली झाली नाही तर स्पर्धेत कमबॅक करणं सोपे नाही. न्यूझीलंडचा संघ हा तोडीस तोड असून आयसीसी स्पर्धेतील त्यांची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे पुढचा सामना रंगतदार होईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.