Join us  

ताठ मानेने उभे राहा! रोहित शर्मा म्हणाला, या संघाचा मला अभिमान, पण आज... 

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला.. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये त्यांनी यजमान भारतावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 10:14 PM

Open in App

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला.. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये त्यांनी यजमान भारतावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला.  ट्रॅव्हिस हेडने ( Travis Head) मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची ( Marnus Labuschagne) दमदार साथ मिळाली. या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा करणाऱ्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. या पराभवानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) सहकाऱ्यांचे मनोबल उंचावणारे विधान केले. 

वर्ल्ड कप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडला; इमोशनल Video पाहून देश हळहळला

रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी  १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात, मोहम्मद शमीने दुसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरची ( ४) विकेट घेतली. पाठोपाठ जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. पण, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि भारताच्या हातून मॅच अलगद घेऊन गेली.   

हेडने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा केल्या. लाबुशेनसोबत त्याची २१४ चेंडूंवरील १९२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवलेने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेताना ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने विजय पक्का केला. लाबुशेन ११० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा केल्या आणि ६ विकेट्स व ४२ चेंडू राखून जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ व २०२३ असे सहा वर्ल्ड कप जिंकले.  

 रोहित काय म्हणाला?निकाल आमच्या बाजूने लागला नाही.. आमच्याकडून चांगली कामगिरी आज झाली नाही... पण, आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली, त्यामुळे सहकाऱ्यांनी खचून जाऊ नका, ताठ मानेने उभे राहा. ३०- ४० धावा कमी पडल्या. लोकेश राहुल व विराट कोहली मैदानावर असताना आम्ही २७०-२८० धावांपर्यंत जाऊ असे वाटले होते, परंतु आम्ही पटापट विकेट गमावल्या. २४० धावांचा बचाव करताना विकेट घेणे अपेक्षित होते, परंतु लाबुशेन व हेड यांना श्रेय द्यायला हवं. ऑस्ट्रेलियाने चांगली गोलंदाजी केली. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांनी चांगली कामगिरी केली, तेव्हा विकेट मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो. मी खेळपट्टीला दोष देणार नाही, परंतु आम्ही आज धावा करण्यात अपयशी ठरलो. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया