Join us  

पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:16 AM

Open in App

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला १०० दिवस शिल्लक आहेत आणि त्या निमित्ताने मुंबईत एका भव्य कार्यक्रमात वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, ICC ने काल शेवटच्या क्षणी उपांत्य फेरीची ठिकाणं बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुसार उपांत्य फेरीचे सामने मुंबई व कोलकाता येथे होतील. चेन्नई व बंगळुरू येथे नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने त्यांच्याकडून हा मान काढून घेतला गेल्याचे वृत्त आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पुन्हा नकार घंटा लावली आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मुंबईत खेळण्यास नकार दिला आहे.  स्थानिक मीडियानुसार पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना मुंबईत सुरक्षेच्या कारणास्थव खेळण्यास नकार देत आहेत. पाकिस्तानने तसे आयसीसीला कळवले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास त्यांची लढत मुंबईत खेळवली जाईल. जर उपांत्य फेरीत पाकिस्तान व भारत समोरासमोर आल्यास ती लढत कोलकाताच्या ईडन गार्डनवर होईल. पाकिस्तानने उपांत्य फेरीसाठी कोलकाताची निवड केली आहे. 

१९९१ मध्ये शिवसेनेने पाकिस्तानला वानखेडेवर खेळण्यास विरोध केला होता आणि भारत-पाकिस्तान वन डे सामन्याच्या दोन दिवस आधी वानखेडेची खेळपट्टी खोदली होती. त्यानंतर पाकिस्तानने हा दौराच रद्द केला होता. १९९३ व १९९४ मध्येही पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव येथे खेळण्यास नकार दिला होता. १९९९ मध्ये २५ समर्थकांनी नवी दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी खोदली होती. १२ वर्षांत भारतीय भूमीवर पाकिस्तान पहिली कसोटी मालिका त्यावेळी खेळणार होता.  

यापूर्वी,  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB)  आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या यजमानपदावरून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खोडा घालण्याचे प्रयत्न केले होते. भारतात येणार नाही अशी धमकी देणारी PCB नंतर अहमदाबाद येथे खेळणार नाही असा इशारा देऊ लागले. त्यात चेन्नईची मॅच बंगळुरूत आणि बंगळुरूची मॅच चेन्नईत बदलण्याचा हट्ट त्यांनी धरला. पण, त्यांचे हे सर्व प्रयत्न ICC आणि BCCI ने यशस्वी होऊ दिले नाही आणि त्यांना ठरलेलं वेळापत्रक मान्य करावे लागले. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामना अहमदाबाद येथेच होणार आहे आणि ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याविरुद्धच्या लढती अनुक्रमे बंगळुरू व चेन्नई येथेच होतील.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानशिवसेनामुंबई
Open in App