Join us  

"त्यांच्याकडे धोनी अन् पाकिस्तानकडे दुधाचे दात न तुटलेले खेळाडू, तरीही चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हीच जिंकलो"

IND vs PAK, champions trophy 2017 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला चीतपट करून किताब पटकावला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:03 PM

Open in App

sarfaraz ahmed । नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला चीतपट करून किताब पटकावला होता. सरफराज अहमदच्या नेतृत्वात पाकिस्तानने मोठा विजय मिळवला आणि इतिहास रचला. खरं तर या सामन्यात पाकिस्तानच्या युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले होते. भारत जिंकेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने चमक दाखवली आणि भारताला पराभवाची धूळ चारली. याच सामन्यातील आठवणींना उजाळा देताना पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदने मोठे विधान केले आहे. 

पाकिस्तानातील एका पॉडकास्टमध्ये त्याने म्हटले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. भारताविरूद्ध अंतिम सामना जिंकल्याचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. फायनलच्या सामन्यात आम्ही भारताला 339 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, विराट कोहली होते. तर पाकिस्तानी संघात असे खेळाडू होते, ज्यांचे दुधाचे दात देखील तुटले नव्हते. आमच्याकडे युवा खेळाडू होते, जे आज पाकिस्तानी संघात शानदार लयनुसार खेळत आहेत." 

...तरीही चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हीच जिंकलो - अहमद बाबर आझम, हसन अली, शादाब खान, फरीम अशरफ या युवा खेळाडूंचा सरफराज अहमदने उल्लेख केला. जर आपण पाकिस्तानी संघाची तुलना भारतीय संघासोबत केली तर, ते अजिबात योग्य ठरणार नाही. कारण आमच्याकडे केवळ शोएब मलिक आणि मोहम्मद हफिज हे 2 अनुभवी खेळाडू होते कारण इतर सर्व खेळाडू युवा होते. 

भारताचा पराभव करून पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडच्या धरतीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 338 धावा केल्या. फखर जमानने पाकिस्तानसाठी 114 धावांची शानदार खेळी केली. 339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 180 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली होती. भारतीय संघ अंतिम सामन्यात 30.3 षटकांत 180 धावांत आटोपला होता. भारताच्या खराब खेळीमुळे पाकिस्तानने 158 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हसन अली यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसी आंतरखंडीय चषकमहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीपाकिस्तान
Open in App