Join us  

IND vs AUS, 4rth Test : रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान  

IND vs AUS, 4rth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 7:13 PM

Open in App

IND vs AUS, 4rth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरा असा आहे. ही कसोटी जिंकून रोहित शर्मा अँड कंपनी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC Final) फायनलसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, तिसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ज्याप्रकारे भारताला आपल्याच जाळ्यात अडकवले, त्यावरून चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया क्वचितच फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करेल. बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.  

चौथ्या कसोटीपूर्वी भारताचं टेंशन वाढवणारी बातमी येऊन धडकली; आता कशी वाचवणार BG ट्रॉफी?

वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत तिसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीला ( Mohammed Shami ) संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय कर्मचार्‍यांशी सल्लामसलत करून, इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) चे बहुतेक सामने खेळणार्‍या आणि वन डे वर्ल्ड कपच्या आयोजनात सहभागी असलेल्या वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोड व्यवस्थापनाची योजना आखली आहे. शमीने पहिले दोन कसोटी सामने खेळले होते आणि तो वन डे संघाचाही एक भाग आहे. इंदूर कसोटीत त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.

मोहम्मद सिराजने पहिल्या तीन कसोटींमध्ये केवळ २४ षटके टाकली आहेत आणि १७ ते २२ मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीनही वन डे सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याजागी शमीची एन्ट्री होऊ शकते.  शमी सध्याच्या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये ३० षटके टाकली असून सात विकेट्स घेतल्या आहेत. मोटेराच्या कोरड्या खेळपट्टीवर संघाला त्याची अधिक गरज भासेल. अशी खेळपट्टी रिव्हर्स स्विंगसाठी पोषक ठरू शकते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळपट्टीबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून कोणतेही विशेष निर्देश मिळालेले नाहीत. जानेवारीमध्ये रेल्वे आणि गुजरात यांच्यातील रणजी ट्रॉफी सामना येथे शेवटचा सामना झाला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. मालिकेतील तिन्ही कसोटी सामने ३ दिवसात संपले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मामोहम्मद शामीमोहम्मद सिराज
Open in App