Join us

IND vs AUS: रोहित शर्माने पुजाराला दिली बॉलिंग; अश्विनने उपस्थित केला सवाल, म्हणाला, "मी काय..."

या सामन्यातील जेव्हा दोन षटक शिल्लक होते, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने फलंदाज शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना बॉलिंग दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:26 IST

Open in App

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवून भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) जाण्याचा मार्ग मोकळा केला. 

ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला. ही कसोटी ड्रॉ राहिली आणि भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशी जिंकली. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नावावर केली. २०१७, २०१८-१९, २०२०-२१ आणि २०२३ मध्ये भारताने ही ट्रॉफी जिंकली.  घरच्या मैदानावरील भारताचा हा १६ वा कसोटी मालिका विजय आहे. 

या सामन्यातील जेव्हा दोन षटक शिल्लक होते, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने फलंदाज शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना बॉलिंग दिली. दोघांनीही चांगली बॉलिंग केली. मात्र रोहितच्या या निर्णयावर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ट्विट करत मजेशीर सवाल उपस्थित केला आहे. पुजाराचा बॉलिंग करतानाचा फोटो शेअर करत मी काय करु?, बॉलिंग सोडून देऊ का?, असा मजेशीर प्रश्न ट्विटरद्वारे उपस्थित केला. यावर पुजारानेही अश्विनला भन्नाट रिप्लाय दिला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराटने अक्षर पटेलसह ( Axar Patel) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी,  रोहित शर्मा ( ३५), चेतेश्वर पुजारा ( ४२), रवींद्र जडेजा ( २८), केएस भरत ( ४४) यांनी चांगली खेळी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला.  

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला आर अश्विनने पहिली विकेट मिळवून दिली. नाईट वॉचमन म्हणून आलेला मॅथ्यू कुहुनेमन ६ धावांवर LBW झाला. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९२ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने ही जोडी तोडली. त्याने टाकलेल्या अप्रतिम चेंडूवर ट्रॅव्हिसचा त्रिफळा उडाला. ट्रॅव्हिस १६३ चेंडूंत ९० धावांवर बाद झाला. सामन्याचा निकाल काहीच लागणार नाही असे दिसत असताना रोहितने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांच्याकडूनही गोलंदाजी करून घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनचेतेश्वर पुजाराबीसीसीआय
Open in App