Join us  

IND vs BAN 1st Test : कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात चारशेपार धावसंख्या उभी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 4:25 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात चारशेपार धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) बांगलादेशला धक्के दिले. त्याला कुलदीप यादवची साथ मिळाली. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा केल्या आणि त्यांना फॉलो ऑन टाळण्यासाठी आणखी ७२ धावा कराव्या लागणार आहेत. 

फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचवे अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

सिराजने पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा ( ४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन ( २०) व लिटन दास ( २४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने  त्यांचा डाव हाणून पाडला. १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लिटन दासने जाणूनबुजून सिराजला डिवचले. त्यानंतर सिराजने पुढच्याच षटकात दासचा त्रिफळा उडवला. पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या दासला मग विराटने चिडवले. सामन्यातील हा सर्व प्रकार भारतीय चाहत्यांना मात्र आनंद देणारा ठरला. 

कुलदीप यादवनेही पुनरागमनाच्या कसोटीत दमदार फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल केली. त्याने मुश्फीकर रहिम ( २८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन ( १६) यांच्या विकेट्स घेत बांगलादेशला सातवा धक्का दिला. कुलदीपने १० षटकांत ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा केल्या.  

तत्पूर्वी, शुबमन गिल ( २०), लोकेश राहुल ( २२) व  विराट कोहली ( १) हे तिघे फलकावर ४८ धावा असताना माघारी परतले.  रिषभ पंत ( ४६) व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. पुजारा-श्रेयस यांनी ३१७ चेंडूंत १४९ धावांची भागीदारी केली. पुजारा २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांवर बाद झाला. श्रेयसचा ८६ धावांवर त्रिफळा उडवला. आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी २०० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. अश्विनने ११३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या. कुलदीप ४० धावांवर माघारी परतला अन् भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर आटोपला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशकुलदीप यादवमोहम्मद सिराजआर अश्विन
Open in App