Join us  

IND vs BAN: बांगलादेशविरूद्धच्या विजयाने भारताला झाला मोठा फायदा; टीम इंडियाची WTCच्या फायनलकडे कूच

India vs Bangladesh, 2nd Test: भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:24 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून 2-0 ने मालिकेवर कब्जा केला आहे. आज अखेरच्या दिवशी यजमान बांगलादेशच्या संघाने शानदार पुनरागमन करून भारताची धाकधुक वाढवली होती. मात्र, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार खेळी करून यजमानांना पराभवाची धूळ चारली. श्रेयस अय्यर (29) आणि रविचंद्रन अश्विन (42) यांनी नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

बांगलादेशविरूद्धच्या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2023) फायनलकडे कूच केली आहे. खरं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्त्वाची होती. या मालिकेपूर्वी 55.77 गुणांसह भारत WTC पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आजच्या विजयामुळे भारताने 58.93 गुण मिळवले असून आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे. 

टीम इंडियाची WTCच्या फायनलकडे कूच

लक्षणीय बाब म्हणजे भारताने आजचा सामना गमावला असता तर संघाला कोणत्याही परिस्थितीत उरलेले चारही सामने जिंकावे लागले असते. मात्र आजच्या विजयाने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग सोपा झाला आहे. आता  भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले तर त्यांचे गुण 62.5 होतील आणि टीम इंडिया सहजपणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. 

तत्पुर्वी, या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा करून सामन्यात 87 धावांची आघाडी घेतली होती. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे संघ मजबूत स्थितीत होता. 

बांगलादेशी गोलंदाजांचे वर्चस्व 

बांगलादेशची फलंदाजी दुसऱ्या डावात देखील अयशस्वी ठरली. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून यजमानांना केवळ 231 धावांवर रोखले. खरं तर भारतासमोर विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य होते. मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी देखील आपल्या चाहत्यांना जागे करत भारताला धक्के दिले. भारताचे ४ गडी स्वस्तात माघारी परतले.  बांगलादेशकडून महेदी हसनने सर्वाधिक 5 बळी पटकावले. 

भारताचे फलंदाज ठरले अयशस्वी भारताच्या दुसऱ्या डावात यजमानांनी बाजी मारली. भारताकडून अक्षर पटेल वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. लोकेश राहुल (2), शुबमन गिल (7), चेतेश्वर पुजारा (6), अक्षर पटेल (34), विराट कोहली (1), जयदेव उनाडकड (13) आणि रिषभ पंत (9) धावा करू माघारी परतला. 

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

दुसऱ्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार) नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघबांगलादेशआॅस्ट्रेलिया
Open in App