Sunil Gavaskar Angry on KL Rahul, Ind vs Eng 1st ODI : भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल याने ८७, श्रेयस अय्यरने ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. भारताला विजय मिळाला असला तरी केएल राहुलच्या फलंदाजीच्या पद्धतीवर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर चांगलेच संतापले.
काय म्हणाले सुनील गावसकर?
लोकेश राहुलने सामन्यात ९ चेंडू खेळून केवळ २ धावा केल्या. त्याच्या या खेळीवर गावसकर चिडले. "केएल राहुलने त्याचा नैसर्गिक खेळ खेळायला काहीच हरकत नाही. पण त्याने ही गोष्टही पाहिली पाहिजे होती की समोर उभा असलेला शुभमन गिल शतक करण्याच्या जवळ पोहोचला आहे. अशावेळी एक फलंदाज म्हणून आपल्या साथीदाराच्या शतकाला प्राधान्य देणे जास्त गरजेचे आहे. पण राहुलने बेजबाबदार फटका खेळून स्वतःची विकेट घालवली. मी जे म्हणत होतो, अगदी तसंच झालं. राहुलला ही गोष्ट समजायला हवी की हा एक सांघिक खेळ आहे. अशा वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे फटकेबाजी करून चालत नाही. चेंडू थोडासा लांब मारून साथीदाराला स्ट्राइक देण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्यात स्पष्टता नव्हती. त्यामुळे अर्धवट फटका मारून बाद झाला," अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी राहुलला खडेबोल सुनावले.
भारताची दमदार कामगिरी
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फिल सॉल्ट (४३) आणि बेन डकेट (३२) हे चांगले खेळले. त्यानंतर कर्णधार जोस बटलर (५२) आणि जेकब बेथेल (५१) यांनीही अर्धशतके ठोकून संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण खालच्या फळीत जोफ्रा आर्चरने केलेल्या २१ धावांच्या मदतीने इंग्लंडला २४८ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने १४ चौकारांसह सर्वाधिक ८७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत झटपट ५९ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने ५२ धावांची संयमित खेळी केली. या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३८.४ षटकांतच सामना जिंकला.