Join us  

IND vs PAK : Asia Cup 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या द्विदेशीय मालिकेचा मुद्दा सुटणे अवघडच आहे. आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेत हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:56 AM

Open in App

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या द्विदेशीय मालिकेचा मुद्दा सुटणे अवघडच आहे. आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेत हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. पण, आता त्यावरूनही रणकंदन सुरू झालं आहे आणि त्याला कारण Asia cup 2023 चे यदमानपद ठरत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे आणि भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार नसल्याची स्पष्ट भूमिका BCCI चे सचिव जय शाह यांनी घेतली. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या विधानाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही ( PCB) चांगल्या मिरच्या झोंबल्या. PCB अध्यक्ष रमीझ राजा यांच्याकडून भारतात पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची धमकी आहे. अर्थात BCCI ची ताकद पाहता राजा यांची भूमिका नंतर मवाळ झाली. 

पण, भारत पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. जोपर्यंत शेजारील राष्ट्रातून दहशतवादींना खतपाणी घालणं बंद होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये क्रिकेट शक्य नाही, असे विधान जयशंकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,'स्पर्धा होणार आहेत आणि तुम्हाला सरकारची भूमिका माहीत आहेच... पाहुया काय होतंय. हा खूप किचकट विषय आहे. '

मी तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली तर तुम्ही माझ्याशी बोलाल का? जर तुमचा शेजारी उघडपणे दहशतवादाला मदत करत असेल आणि त्यांचे नेते कोण आहेत, शिबिरे कुठे आहेत याबद्दल कोणतेही रहस्य नाही. सीमेपलीकडील दहशतवाद सामान्य आहे असे आपण कधीही समजू नये. मला आणखी एक उदाहरण द्या, जिथे एक शेजारी दुसर्‍या विरोधात दहशतवाद पुरस्कृत करत आहे. असे एकही उदाहरण नाही. एका प्रकारे, हे अगदी असामान्य नाही, परंतु अपवादात्मक आहे, असे ते आज तकच्या कार्यक्रमात बोलत होते. 

या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख रमीझ राजा म्हणाले की, भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर न आल्यामुळे जर त्यांचे यजमान काढून घेतल्यास पाकिस्तान आशिया चषक २०२३  मधून बाहेर पडण्याचा विचार करू शकतो. 

ऑक्टोबरच्या सुरुवातीला, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती आणि म्हटले होते की आशिया कप तटस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल. या दोन संघांनी शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये खेळली होती. 

भारताने आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात जाणार नाही, अशी धमकीही रमीझ राजा यांनी दिली होती. ही सर्व विधाने भारत सरकार आणि बीसीसीआय एकाच पृष्ठावर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे ते आशिया चषक २०२३  मध्ये भाग घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात पाठवण्याची शक्यता फारच कमी आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022
Open in App