भारताविरुद्धच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी सावध सुरुवात करून दिल्यानंतर आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला पायचित करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला आहे. पहिल्या १० षटकांमध्ये पाकिस्तानने १ बाद ४९ धावा काढल्या आहेत.
भारताने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांचा वेगवान मारा आरामात खेळून काढला. दरम्यान, इमाम उल हकने सिराजच्या एका षटकात तीन चौकार ठोकत १२ धावा वसूल केल्या. एकीकडे जसप्रीत बुमराहचा मारा अचूक होत असताना पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद सिराजला लक्ष्य करत होते. ७.५ षटकांमध्ये पाकिस्तानने बिनबाद ४१ अशी आगेकूच केली होती. मात्र याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला पायचित केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. अब्दुल्ला शफिकने २० धावा काढल्या.
दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाने संघात एक बदल केला असून, डेंग्युवर मात करणाऱ्या शुभमन गिल याला या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. तर पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला येणाऱ्या इशान किशनला वगळण्यात आलं आहे. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या संघात फार मोठे फेरबदल करणे टाळले आहे.