नवी दिल्ली - रविवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला होता. शेवटच्या चेंडूवर निकाल लागलेल्या या सामन्यात विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सोशल मीडियावरून टीम इंडिया आणि विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतरही नेटिझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले.
नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ट्विट केले होते. मात्र त्यांनी या ट्विटमध्ये भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीच्या नावाचा साधा उल्लेखही केला नव्हता.त्यामुळे गांगुली यांनी केलेल्या ट्विटवर नेटिझन्स भडकले आणि त्याला ट्रोल करू लागले.
सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, टीम इंडियाला शानदार विजय आणि टी-२० विश्वचषकाच्या धमाकेदार सुरुवातीसाठी शुभेच्छा. सौरव गांगुली यांनी हे ट्विट बीसीसीआयला टॅग केले होते. मात्र या ट्विटमध्ये विराट कोहलीला टॅग करण्यात आले नाही. तसेच त्याच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे नेटिझन्स गांगुलींवर भडकले. त्यानंतर अनेकांनी गांगुलींना सोशल मीडियावरून सुनावले.
एका युझरने लिहिले की, एक व्यक्ती बीसीसीआयमधून हटली आणि विराट कोहली पुन्हा चेसमास्टर बनला. दादाचे बीसीसीआयमधून हटल्याबद्दल आभार. आणखी एकाने लिहिले की, तुम्ही तर निघून गेलात, मात्र किंग इज बॅक, तर आणखी एकाने लिहिले की कर्म समोर येतातच.