Join us  

IND vs SA, 2nd Test : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला हवं होतं; KL Rahulच्या निवडीवरून संघ व्यवस्थापनावर निशाणा

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचा सर्वाधिक उणीव जाणवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 5:04 PM

Open in App

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचा सर्वाधिक उणीव जाणवली. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर २४० धावांचे लक्ष्य ही अवघड गोष्ट होती. पण, कर्णधार डीन एल्गनं दमदार खेळ करताना भारताला ७ विकेट्सनं पराभूत केलं. शॉन पोलॉकपासून अनेकांनी विराटचे नसणे भारताला महागात पडल्याचा दावा केला. क्षेत्ररक्षण करताना विराटचा जो आक्रमकपणा असतो तो लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात दिसला नाही. पण, याचवेळी विराट नसताना टीम इंडियाच्या कसोटी संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane) सोपवायला हवी होती, असे मत भारताचा माजी सलामीवर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं व्यक्त केले.   InsideCricket show बोलताना तो म्हणाला,'' भारताला विराट कोहलीची उणीव प्रकर्षानं जाणवली. कारण, मैदानावर प्रचंड आक्रमक असतो. असा खेळाडू जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा चुकीला थारा नसतो. त्यामुळे त्याची एनर्जी मिस केली.'' पण, विराटच्या अनुपस्थित लोकेश राहुल हा कर्णधार म्हणून योग्य पर्याय होता का?; या प्रश्नावर जाफरनं नाही असे उत्तर दिले. कोहली दुखापतीमुळे बाहेर होता, तर अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद द्यायला हवं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारत एकही कसोटी हरलेला नाही.   ''संघ व्यवस्थापनाच्य निर्णयानं मला आश्चर्याचा धक्का बसला. कसोटीत एकही सामना न गमावलेला अजिंक्य रहाणेसारखा पर्याय कर्णधार म्हणून तुमच्याकडे असताना लोकेश राहुलला कर्णधार करण्याची गरज काय?; त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेतृत्व कौशल्य दाखवले आहे,'' असे जाफर म्हणाला. ''मी लोकेश राहुलच्या विरोधात अजिबात नाही. तो तरूण आहे आणि पंजाब किंग्सचे नेतृत्व त्यानं सांभाळले होते.  लोकं त्याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहत आहेत, परंतु विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यनं कर्णधारपद भूषवायला हवं होतं,''हेही जाफरनं स्पष्ट केलं. 

सामन्यात नेमकं काय झालं? भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेनं २२९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, दुसऱ्या डावात भारतालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी खेळी अन् हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारतानं २ ६६ धावा करून आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत डीन एल्गरनं खिंड लढवत आफ्रिकेला २ बाद ११८ धावा उभारून दिल्या. चौथ्या दिवशी पावसामुळे साडेपाच तासांचा खेळ वाया गेला.  त्यानंतर ३४ षटकांच्या डावात आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून विजय मिळवत इतिहास घडवला.

जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं.   

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीअजिंक्य रहाणेलोकेश राहुलवासिम जाफर
Open in App