Join us  

IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyerची अफलातून खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात पाचच खेळाडूंना करता आलीय ही कामगिरी

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 9:58 PM

Open in App

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खान व मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. त्यांचे ४ फलंदाज २९ धावांवर माघारी परतले असताना कर्णधार दासून शनाका ( Dasun Shanaka) पुन्हा एकदा टीम इंडियासमोर नांगर रोवून उभा राहिला. पण, त्याला भारताच्या श्रेयस अय्यरकडून ( Shreyas Iyer) तोडीस तोड उत्तर मिळाले. श्रेयसने आजही दमदार कामगिरी करताना विराट कोहलीच्या ( Virat Kohli) विक्रमाशी बरोबरी केली. 

मोहम्मद सिराजने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आवेशने पथूम निसांकाला ( १) चरिथ असालंकाची ( ४) यांची विकेट घेतली. ९व्या षटकात रवी बिश्नोईने जनिथ लियानागेला बाद केले. पण, शनाका पुन्हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. त्याने सहाव्या विकेटसाठी चामिका करुणारत्नेसह अर्धशतकीय भागीदारी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. आवेश खानने टाकलेल्या १९व्या षटकात शनाकाने १९ धावा चोपून काढल्या. शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि श्रीलंकाने ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. 

पुन्हा एकदा दुष्मंथा चमिराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा चमिराने रोहितची विकेट घेतली. कर्णधार ५ धावांवर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या, परंतु सॅमसनला ( १८) मोठी खेळी साकारता आली नाही.  रोहितच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४५ वेळा एकेरी धावसंख्येवर माघारी परणारा तो फलंदाज ठरला. त्याने आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा ( ४४) नकोसा विक्रम नावावर केला.  

दीपक हुडाला आज पुढे पाठवण्यात आले आणि त्यानेही काही सुरेख फटके मारले, परंतु लाहिरू कुमाराने भन्नाट यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. हुडाने २१ धावा केल्या. श्रेयसने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. एका ट्वेंटी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यरविराट कोहली
Open in App