Join us  

IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांची चिवट खेळी व्यर्थ ठरली. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी डेथ ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:43 PM

Open in App

India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांची चिवट खेळी व्यर्थ ठरली. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी डेथ ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या ५ बाद १८६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ३ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. हर्षलने १८व्या षटकात ८ धावा दिल्या, त्यानंतर भुवीनं १९ व्या षटकात फक्त ४ धावा देत १ विकेट घेतली. तिथेच विंडीजच्या हातून सामना निसटला आणि भारताने ८ धावांनी विजय मिळवला.  

रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला.   

प्रत्युत्तरात विंडीजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कायले मेयर्स ( ९) व  ब्रेंडन किंग ( २२) झटपट माघारी परतले. पण, निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी शतकी भागीदारी करून विंडीजला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. विंडीजला ३६ चेंडूंत ७२ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स होत्या. पूरन व पॉवेल यांनी ६२ चेंडूंत शतकी भागीदारी केली. १९व्या षटकात भुवीने ही भागीदारी तोडली. पूरन ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला.  भुवीने १९ व्या षटकात ४ धावा देताना १ विकेट घेतली अन् सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. हर्षलने अखेरच्या षटकात १६ धावा दिल्या. पॉवेल ३६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला.  

रोहित शर्मा काय म्हणाला?सामन्यानंतर रोहितने भुवीचे कौतुक केले. तो म्हणाला,''वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना नेहमी पराभवाची भीती असतेच. सामन्याच्या शेवट अविस्मरणीय झाला. या धावांचा बचाव करणे सोपं नाही, हे आम्हाला सुरुवातीपासून माहित होतं, परंतु आम्ही आखलेल्या रणनीतीची योग्य अमंलबजावणी केली. याचा मला अभिमान आहे. भुवनेश्वर कुमार जेव्हा गोलंदाजीला आला, तो क्षण अत्यंत दडपणाचा होता. पण, त्यानं अनुभवाच्या जोरावर सामना फिरवला. अनेक वर्ष भुवी हेच करत आला आहे आणि आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.''

रोहित पुढे म्हणाला,''विराटने ज्या प्रकारे खेळ केला, त्याने माझ्यावरील दडपण कमी केले. ही महत्त्वाची खेळी होती. रिषभ व वेंकटेश यांनी शेवट दमदार केला. वेंकटेशच्या खेळीत आलेली परिपक्वता पाहून आनंद झाला. त्यात तो आत्मविश्वास दिसला आणि त्याने मला विचारलेही मला षटक टाकायला मिळेल का. क्षेत्ररक्षणात थोडासा ढिसाळपणा जाणवला. त्या कॅच घेतल्या असत्या तर यापेक्षा चांगली कामगिरी झाली असती.  पुढे जायचंय तर अशा चुका कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.'

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभुवनेश्वर कुमाररिषभ पंतविराट कोहली
Open in App