लॉडरहील : भारताने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजच्या संघाला अपयश आले. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ ने विजय मिळवून वर्चस्व गाजवले. भारताकडून श्रेयस अय्यरने ६४ धावांची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. भारताने २० षटकात ७ बाद १८८ एवढी धावसंख्या उभारली होती, ज्याचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या १०० धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजांच्या फिरकीच्या जोरावर संघाने पाचव्या सामन्यात ८८ धावांनी मोठा विजय मिळवला.
वेस्टइंडिजकडून शिमरॉन हेटमायरने एकतर्फी झुंज देऊन डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची खेळी निष्फळ ठरली. त्याने ३५ चेंडूत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली.
भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ४ बळी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावून वेस्टइंडिजच्या फलंदाजीची कंबर मोडली. जेसन होल्डर, एस ब्रुक्स आणि डी थॉमस यांना आपल्या फिरकीवर नाचवून अक्षरने विंडीजवर सुरूवातीपासूनच दबाव राखून ठेवला. शिमरॉन हेटमायर वगळता कोणत्याच विंडीजच्या फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही.
भारतीय संघाचा बोलबाला
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर ईशान किशन स्वस्तात माघारी परतला मात्र श्रेयस अय्यरने ताबडतोब फलंदाजी करून विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडला. शेवटच्या काही षटकांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करून विंडीच्या गोलंदाजांना चितपट केले. हार्दिकने १६ चेंडूत २८ धावांची ताबडतोब खेळी केली आणि शेवटच्या षटकात तो स्मिथकडून धावबाद झाला. वेस्टइंडिजकडून जेसन होल्डर, हेडन वॉल्श आणि डी ड्रेक्स यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. तर ओडियन स्मिथने २ बळी पटकावून संजू सॅमसन (१५) आणि दिनेश कार्तिकला (१२) तंबूत पाठवले. होल्डरने त्याच्या दुसऱ्या षटकात अय्यरला बाद करून धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र तोही निष्फळ ठरला.
भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी ४ बदल
आजच्या सामन्यात भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात ४ बदल करण्यात आले असून कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाने मालिकेतील ३ सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजच्या सामन्याचा निकाल फारसा निर्णायक ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी वेस्टइंडिजचा संघ -
निकोलस पूरन (कर्णधार), एस ब्रुक्स, शिमरॉन हेटमायर, आर. पॉवेल, डी.थॉमस, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, के.पॉल, डी ड्रेक्स, ओ. मॅकॉय, हेडन वॉल्श.
Web Title: IND vs WI T20 India won the 5th match in t20 series against west indies by 88 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.