Join us  

IND-W vs ENG-W Semi Final:भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी लढत पार पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:47 PM

Open in App

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी लढत पार पडली, ज्यामध्ये भारतीय संघाने ४ धावांनी विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून २० षटकात ५ बाद १६४ एवढी धावसंख्या उभारली. स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान संघाला १६५ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या संघाला २० षटकात ६ बाद १६० धावा करता आल्या आणि भारताचे फायनलचे तिकिट पक्के झाले. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती. मात्र स्नेह राणाने शानदार गोलंदाजी करून इंग्लिश फलंदाजांना आपल्या तालावर नाचवून निसटता विजय मिळवला. शेवटच्या ३ चेंडूमध्ये इंग्लिश संघाला १३ धावांची आवश्यकता असताना राणाने तीन चेंडूत अनुक्रमे १,१ आणि ६ अशा धावा देऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

पहिल्या डावात स्मृतीने क्रिकेटच्या पंढरीत आपल्या फलंदाजीने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला आणि अवघ्या ३२ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडच्या संघाने सुरूवातीपासूनच ताबडतोब फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरूवात केली होती मात्र भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. यजमान संघाकडून सोफिया डंकले (१९), डॅनी व्याट (३५), एमी जोन्स (३१) आणि ॲलिस कॅप्सीने (१३) धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने २ तर दीप्ती शर्माने १ बळी पटकावला आणि डाव सावरला. तर ॲलिस कॅप्सी आणि कर्णधार नॅट सायव्हर या धावबाद झाल्या.  

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत स्मृतीने शानदार फलंदाजी केली आणि संघाला चांगली सुरूवात करून दिली. स्मृतीने तिच्या खेळीमध्ये एकूण ८ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकला होता मात्र मानधना बाद होताच भारताचा डाव फिसकटला. अखेर इंग्लिश संघाने सामन्यात पकड बनवून भारताला २० षटकात १६४ धावांवर रोखले. 

भारताची सांघिक खेळीमानधनाला वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शेफाली वर्मा (१५), हरमनप्रीत कौर (२०), दीप्ती शर्मा (२२) आणि जेमिमा रॉड्रिग्जने ३१ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी करून भारताला एका मजबूत स्थितीत पोहचवले. इंग्लंडकडून फ्रेया केम्पने सर्वाधिक २ बळी घेतले तर कर्णधार नॅट सायव्हरला आणि कॅथरीन ब्रंटला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

भारतीय संघाचा उपांत्यफेरीपर्यंतचा प्रवास राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संघाचा आपल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. नंतर आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला चितपट करून भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली. दरम्यान, बारबाडोसविरूद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. भारतीय संघ १ पराभव आणि २ विजयासह इथपर्यंत पोहचला होता. स्मृती मानधनाने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करून भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले होते. या मराठमोळ्या खेळाडूने पाकिस्तानविरूद्ध देखील ताबडतोब अर्धशतकी खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला होता. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.  आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - नॅट सायव्हर (कर्णधार), डॅनी व्याट, सोफिया डंकले, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, माइआ बाउचर, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इझी वोंग, सारा ग्लेन. 

 

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयभारतइंग्लंडस्मृती मानधना
Open in App