Join us  

IND-W vs ENG-W Semi Final:स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 5:05 PM

Open in App

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत सुरू आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार फलंदाजी करून २० षटकात ५ बाद १६४ एवढी धावसंख्या उभारली. स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लिश संघाला १६५ धावांचे आव्हान दिले. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना या स्पर्धेच्या सुरूवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. आज क्रिकेटच्या पंढरीत देखील स्मृतीने आपल्या फलंदाजीने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला आणि अवघ्या ३२ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. 

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत स्मृतीने शानदार फलंदाजी केली. स्मृतीने तिच्या खेळीमध्ये एकूण ८ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकला होता मात्र मानधना बाद होताच भारताचा डाव फिसकटला. अखेर इंग्लिश संघाने सामन्यात पकड बनवून भारताला २० षटकात १६४ धावांवर रोखले. 

स्मृतीची शानदार खेळी 

मानधनाला वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शेफाली वर्मा (१५), हरमनप्रीत कौर (२०), दीप्ती शर्मा (२२) आणि जेमिमा रॉड्रिग्जने ३१ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी करून भारताला एका मजबूत स्थितीत पोहचवले. इंग्लंडकडून फ्रेया केम्पने सर्वाधिक २ बळी घेतले तर कर्णधार नॅट सायव्हरला आणि कॅथरीन ब्रंटला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संघाचा आपल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. नंतर आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला चितपट करून भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली. दरम्यान, बारबाडोसविरूद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामना जिंकून फायनलचे तिकिट मिळवणे हे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असेल. भारतीय संघ १ पराभव आणि २ विजयासह इथपर्यंत पोहचला आहे, त्यामुळे इंग्लिंश संघाला त्यांच्याच धरतीवर भारत चितपट करणार का हे पाहण्याजोगे असेल. स्मृतीने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करून भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. मराठमोळ्या खेळाडूने पाकिस्तानविरूद्ध देखील ताबडतोब अर्धशतकीय खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला होता. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.  आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - नॅट सायव्हर (कर्णधार), डॅनी व्याट, सोफिया डंकले, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, माइआ बाउचर, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इझी वोंग, सारा ग्लेन. 

 

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारतीय क्रिकेट संघभारतइंग्लंडस्मृती मानधनाटी-20 क्रिकेट
Open in App