Join us  

एक नंबर! टीम इंडियाने ५ विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाला नमवले, पाकिस्तानचे वस्त्रहरण झाले

India vs Australia 1st ODI Live Marathi : भारताने हा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९६ नंतर भारताने प्रथमच मोहाली येथील वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 9:45 PM

Open in App

India vs Australia 1st ODI Live Marathi : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमी ( Mohammed Shami) ने १०-१-५१-५ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या नव्या सलामीवीरांनी १४२ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय फलंदाज त्यांना पुरून उरले. सूर्यकुमार यादवने विश्वास सार्थ ठरवला अन् लोकेश राहुल कॅप्टन इनिंग्ज खेळला. भारताने हा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९६ नंतर भारताने प्रथमच मोहाली येथील वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. 

आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी म्हणून ही मालिका खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी भारताला १४२ धावांची भागीदारी करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांनी सर्वाधिक १७ शतकी भागीदारी केल्या आहेत. भारताने आज इंग्लंडचा ( १६) विक्रम मोडला. ऋतुराज ७७ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर एडम झम्पाच्या चेंडूवर LBW झाला.  शुबमनही ६३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७४ धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशान किशन व लोकेश राहुल यांनी डाव सावरला होता, परंतु पॅट कमिन्सने ही जोडी तोडली. इशान १८ धावांवर झेलबाद झाला. 

लोकेश व सूर्यकुमार यादव हे संयमाने खेळपट्टीवर खिंड लढवत होते. भारताला विजयासाठी ६० चेंडूंत ५४ धावांची आवश्यकता होती. सूर्यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दाखवलेला विश्वास आज सार्थ ठरला आणि त्याने ४७ चेंडूंत वन डेतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. तो ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर झेलबाद झाला. लोकेशने नाबाद 58 धावांची खेळी करून भारताचा विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून ही मॅच जिंकली अन् पाकिस्तानला फटका बसला. भारतीय संघ आता वन डे क्रमवारीतही नंबर १ झाला आहे आणि त्यांनी पाकिस्तानला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. टीम इंडिया ट्वेंटी-२० व कसोटीतही नंबर १ आहे. 

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस यांच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलिया सहज ३००+ धावा उभारतील असे वाटले होते. शमीने पहिल्याच षटकात धक्का दिला, परंतु स्टीव्ह स्मिथ ( ४१) व डेव्हिड वॉर्नर ( ५२) यांनी १०६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ( ३९) व कॅमरून ग्रीन ( ३१) यांनी ४५ धावांची भागीदारी केली. जोश इंग्लिस ( ४५) आणि ग्रीन यांच्यातला ताळमेळ चुकल्याने भारताला एक विकेट मिळाली. इंग्लिस व मार्कस स्टॉयनिस ( २९) यांनी चांगला खेळ केला. पॅट कमिन्सनेही नाबाद २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २७६ धावांत तंबूत परतला. शार्दूल ठाकूरने १० षटकांत सर्वाधिक ७८ धावा दिल्या.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसीपाकिस्तानशुभमन गिलऋतुराज गायकवाड