Join us  

India Vs Australia 4th Test: सुर्यकुमारला पुन्हा मिळणार संधी?; 'या' ३ खेळाडूंना मिळू शकतो डच्चू, अशी असू शकते भारताची Playing XI

India Vs Australia 4th Test: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 3:01 PM

Open in App

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला. अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेतील खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला आहे. तीनही सामन्यांचे निकाल तीन दिवसांत लागले. आयसीसीने इंदूरची खेळपट्टी खराब असल्याचे सांगून तिला तीन डिमेरिट गुणही दिले होते. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत कोणत्या प्रकारची खेळपट्टी आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतच्या जागी भारतीय संघ इशान किशनला चौथ्या कसोटीत संधी देऊ शकतो. आत्तापर्यंत या मालिकेत भरतची कामगिरी सरासरीपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत किशनला कसोटीत पदार्पणाची संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

मोहम्मद शमी परतणार-

मोहम्मद शमी शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल. शमीला इंदूर कसोटीत विश्रांती देण्यात आली होती. उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली असली तरी शमी हा अनुभवी गोलंदाज असल्याने सिराजच्या जागी शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव-

चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरवर टांगती तलवार असू शकते. संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची रणनीती आखल्यास अय्यरला बाहेर बसावे लागेल. जेणेकरून सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करता येईल. सूर्याला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पण तो अपयशी ठरला होता.

पराभवामुळे टीम इंडियाचा प्लॅन बदलला-

भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला चकित केले होते. पण इंदूर कसोटी सामन्यात नॅथन लायन आणि मॅट कुहनमन यांनी रचलेल्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी फिरकीचे असे जाळे विणले की भारताला दोन्ही डावात ३०० धावाही करता आल्या नाहीत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयसूर्यकुमार अशोक यादव
Open in App