ख्राईस्टचर्च - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र सामन्याच्या ऐन पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला भारतीय संघात स्थान मिळू शकते.
रणजी करंडक स्पर्धेत खेळताना इशांत शर्माच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून सावरत तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला होता. तसेच त्याने पहिल्या कसोटीत भेदक गोलंदाजी करत पाच बळीही टिपले होते. मात्र भारतीय संघासाठी मालिकेत करो वा मरो ची स्थिती असतानाच इशांतच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे.
आज भारतीय संघाच्या सरावसत्रास इशांत अनुपस्थित होता. गुरुवारी सराव केल्यानंतर इशांतच्या पायाला वेदना जाणवू लागल्या होत्या. त्याने याबाबतची कल्पना संघव्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर इशांतला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.
इशांतला झालेल्या दुखापतीपूर्वी सलामीवीर पृथ्वी शॉ हा सुद्धा जायबंदी झाल्याचे वृत्त आले होते. पृथ्वी शॉने गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली होती. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात तो तंदुरुस्त नसल्याचे आढळल्यास टीम इंडियात शुभमन गिल पदार्पण करू शकतो. पृथ्वीला पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ३० धावा करता आल्या.
संबंधित बातम्या
दुसऱ्या कसोटीतही भारताची उडणार दांडी? न्यूझीलंडने फिरवली काळी कांडी
India vs New Zealand, 2nd Test : सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त
न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...
विराट कोहलीवर भडकले कपिल देव, म्हणाले...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इशांतने धारदार गोलंदाजी करत पाच बळी टिपले होते. मात्र इशांतचा अपवाद वगळता संघातील इतर खेळाडूंना या सामन्यात आपली म्हणावी तशी छाप पाडता आली नव्हती. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताला १० विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघ २०० धावांच्या आत गारद झाला होता.