विजयी चौकाराच्या निर्धाराने खेळणार भारत; संघातील बदल जवळपास नाहीच

बांगलादेश संघाला गृहीत धरण्याची चूक करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:56 AM2023-10-19T05:56:50+5:302023-10-19T05:57:15+5:30

whatsapp join usJoin us
India will play with the determination of winning four; There is no change in the team at pune agaist Bangladesh | विजयी चौकाराच्या निर्धाराने खेळणार भारत; संघातील बदल जवळपास नाहीच

विजयी चौकाराच्या निर्धाराने खेळणार भारत; संघातील बदल जवळपास नाहीच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- उमेश गो.  जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयांसह शानदार सुरुवात केली. भारतीय संघ आता गुरुवारी (१९ ऑक्टोबर) बांगलादेशच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा, तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे.

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन संघांविरुद्ध भारताने सर्वच क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. दुसरीकडे बांगलादेशने तीनपैकी केवळ एक सामना जिंकला. अफगाणिस्तानला नमवल्यानंतर बांगलादेशचा इंग्लंड आणि न्यूझीलंकडून पराभव झाला.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडला, तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे. तसेच, बांगलादेशची आतापर्यंतची भारताविरुद्धची कामगिरी पाहता रोहितचा संघही सावध आहे. २००७च्या विश्वचषक स्पर्धेत पोर्ट ऑफ स्पेन येथे भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते. त्यानंतर भारताने २०११, २०१५ व २०१९ या तिन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये बांगलादेशला नमवले. मात्र, मागील चारपैकी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशने भारताला नमवले. नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही भारताला सहा धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

बांगलादेशला विजय अनिवार्य

 सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे. कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीतून सावरला आहे, हीच बांगलादेशसाठी आनंदाची बाब आहे. लिट्टन दास, मेहदी हसन मिराज यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे. 

बुधवारी संध्याकाळी पुणे शहरातील काही भागात पाऊस पडल्याने या लढतीवरही पावसाचे सावट आहे. हवामान विभागानुसार गुरुवारी पुण्यात पावसाची शक्यता नाही. पण बुधवारच्या पावसामुळे सामन्याच्या दिवशीही काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लागला आहे.

खेळपट्टीचे स्वरूप 
एमसीए स्टेडियमची खेळपट्टी दिवसा फलंदाजांना साथ देते, तर संध्याकाळी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे येथे धावांचा पाठलाग करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. आतापर्यंत झालेल्या सातपैकी पाच सामन्यांमध्ये पहिल्या डावात ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत, तर केवळ दोनवेळा धावांचा पाठलाग यशस्वी ठरला आहे. भारताने येथे सातपैकी चार सामने जिंकले आहेत.  

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजिद हसन तमीम, नजमुल हसन शान्टो, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, महमदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नासुम अहमद, महेदी हसन, तास्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब.

Web Title: India will play with the determination of winning four; There is no change in the team at pune agaist Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.