Join us  

१९८३ला भारत जगज्जेता, हा सर्वांत मोठा ‘अपसेट’!

अफगाणिस्तानने रविवारी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये चॅम्पियन इंग्लंडचा ६९ धावांनी धक्कादायक पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 5:56 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड -सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

अफगाणिस्तानने रविवारी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये चॅम्पियन इंग्लंडचा ६९ धावांनी धक्कादायक पराभव केला. इंग्लंडच्या पराभवानंतर चाहत्यांना  इतिहासातील मोठ्या अपसेटची आठवण झाली.  ४८ वर्षांच्या इतिहासात विश्वचषकात अनेक अपसेट घडले.  जाणून घेऊया  सर्वांत मोठ्या अपसेटबद्दल...!

 १९९९च्या विश्वचषकात झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी अनपेक्षित पराभव केला. १९९९च्या विश्वचषकात झिम्बाब्वेने भारताचा ३ धावांनी अनपेक्षित पराभव केला. २०११च्या विश्वचषकात बांगलादेशने इंग्लंडला ६ चेंडू शिल्लक राखून २ गड्यांनी नमविले. २०१५च्या विश्वचषकात बांगलादेशने इंग्लंडला १५ धावांनी धूळ चारली. २००७च्या विश्वचषकात बांगलादेशने ९ चेंडू राखून भारताचा ५ गड्यांनी पराभव केला. २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंडला ६९ धावांनी नमविले. 

या विश्वचषकाआधी झालेल्या १२ स्पर्धांमध्ये इतिहासात आजपर्यंतचा सर्वांत मोठा अपसेट घडला तो १९८३ ला लॉर्ड्सवर ! भारताने बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवून चषक उंचावला. याहून मोठा अपसेट आजपर्यंत झालेला नाही.

 यामागील कारणे .... १९८३च्या विश्वचषकाआधी १९७५ आणि १९७९ ला दोनदा विश्वचषकाचे आयोजन झाले. त्यात भारताने केवळ एका विजय नोंदविला तोदेखील ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. आफ्रिका संघात अनिवासी भारतीय खेळाडूंचा भरणा होता. १९७५च्या विश्वचषकात भारताने त्यांना दहा गड्यांनी पराभूत केले होते. १९७५ ला इंग्लंडविरुद्ध झालेल्या एका सामन्यात महान सुनील गावसकर यांनी १७४ चेंडू खेळून नाबाद ३६ धावा केल्या. इंग्लंडच्या ३३४ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ६० षटकांत  १३२ धावा केल्याने २०२ धावांनी सामना गमावला होता. १९७९च्या विश्वचषकात भारत एकही सामना जिंकला नव्हता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जा न मिळालेल्या श्रीलंकेने भारताचा ४७ धावांनी पराभव केला होता.  १९८३च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला कुठल्याही क्रिकेट तज्ज्ञाने दावेदार मानले नव्हते. 

टर्निंग पॉइंट...माझ्या मते, १९७५ आणि १९७९ ला एकही साखळी सामना न गमावता चॅम्पियन बनलेल्या वेस्ट इंडीजच्या बलाढ्य संघाला १९८३च्या विश्वचषक साखळी सामन्यात ३२ धावांनी धूळ चारणे हा भारतीय क्रिकेटसाठी ‘टर्निंग पॉइंट’ होता. ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि उपांत्य सामन्यात दमदार इंग्लंडला नमवून २५ जून १९८३ला फायनलमध्ये  केवळ १८३ धावा उभारणाऱ्या भारताने वेस्ट इंडीजचा ४३ धावांनी पराभव केला. विश्वचषकातील आजपर्यंतचा हा अनपेक्षित, धक्कादायक आणि थरारक अपसेट मानला जातो. कपिल देव यांच्या संघाने दिग्गज ग्रिनिज, हेन्स, रिचर्ड्स, लॉइड, गोम्स, बेकस, डुजॉन, मार्शल, होल्डिंग, गार्नर, ॲन्डी रॉबर्ट्स यांना पाणी पाजले होते. या जेतेपदानंतर केवळ भारत नव्हे तर जगभरात क्रिकेटचे रूप पालटले, लोकप्रियतेचा दृष्टिकोन बदलला.

१९८३च्या संघाने आपल्या विजयाद्वारे हा संदेश दिला की, जब टुटने लगा हौंसला तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तख्त और ताज नहीं होते,ढूंढ लेना अंधेरे में ही मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते !

टॅग्स :वन डे वर्ल्ड कप