Join us  

Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी

पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडपडताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 2:37 PM

Open in App

Shreyas Iyer century in Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर अन् भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरनं अखेर शतकी दुष्काळ संपवला. बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानात रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरनं शतक साजरे केले. ३ वर्षांनी त्याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली आहे.

श्रेयस अय्यरचा शतकी दुष्काळ संपला

सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे त्याचा टीम इंडियातील पत्ता कट झाला आहे. पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडपडताना दिसतोय. दुलीप करंडक आणि इराणी कपमध्येही तो सहभागी झाला होता. पण इथं त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. पण आता त्याचा हा संघर्ष संपल्याचे दिसते. महाराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यातील मोठी खेळीमुळे त्याला आणखी आत्मविश्वास मिळेल.

आयुष म्हात्रेसोबत द्विशतकी भागीदारी, अय्यरनं केली १४२ धावांची खेळी

मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आउट झाल्यावर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने दमदार शतक झळकावले. त्याने युवा सलामीवीर आयुष म्हात्रेच्या साथीनं द्विशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत नेणारी खेळी साकारली. श्रेयस अय्यरनं  या सामन्यातील पहिल्या डावात १९० चेंडूत १४२ धावांची खेळी केली. यात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

अखेरच शतक अन् देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी

श्रेयस अय्यरनं याआधीचं शतक हे २०२१ मध्ये झळकावले होते. नोव्हेंबरमध्ये कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने ही शतकी खेळी केली होती. दुलिप करंडक स्पर्धेत अय्यर ६ डावात दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. या स्पर्धेत २  अर्धशतकासह त्याने फक्त १५४ धावा केल्या होत्या. इराणी चषक स्पर्धेत मुंबईनं इतिहास रचला. पण या सामन्यातही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. मुंबईकडून दोन डावा त्याने ५७ आणि ८ अशा धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील त्याची सुरुवातही खराब झाली होती. बडोद्याविरुद्धच्या लढतीत तो शून्यावर बाद झाला होता.  

टॅग्स :श्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरणजी करंडकमुंबईमहाराष्ट्र