Join us  

कागदावर १५ कोटी पण प्रत्यक्षात मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी मोजले १०० कोटी, वाचा सविस्तर

आयपीएल २०२४ च्या आधी हार्दिक पांड्या सर्वाधिक चर्चेत राहणारा खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 3:31 PM

Open in App

मुंबई : आयपीएल २०२४ च्या आधी हार्दिक पांड्या सर्वाधिक चर्चेत राहणारा खेळाडू ठरला. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेला हार्दिक प्रसिद्धीच्या झोतात कायम आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाल्यानंतर पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. स्पर्धेच्या सतराव्या हंगामात हार्दिक पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईच्या संघाचे नेतृत्व करेल. पण, यामुळे मुंबईचा मावळता कर्णधार रोहित शर्माचे चाहते नाराज झाले. अशातच हार्दिकच्या ट्रेडबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. खरं तर मुंबईच्या फ्रँचायझीने हार्दिकसाठी १५ नव्हे तर १०० कोटी रूपये मोजल्याचे कळते. 

'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या फ्रँचायझीने हार्दिकसाठी मोठी ट्रान्सफर फी भरली असल्याची अटकळ बांधली जात आहे. याबाबत कोणतीही स्पष्ट आकडेवारी समोर आली नसली तरी पांड्याला सोडण्यासाठी गुजरात टायटन्सला १०० कोटी रुपये देण्यात आल्याचा अंदाज आहे. २०२१ मध्ये CVC कॅपिटलने IPL चा भाग होण्यासाठी ५६२४ कोटी रुपये दिले. तर, मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी व्यापारी कुटुंब चालवत आहे, गुजरात टायटन्सच्या बाबतीत असे नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे हार्दिक पांड्याच्या ट्रेड डीलमुळे गुजरातच्या पर्समध्ये १५ कोटींची वाढ झाली.

पांड्याची एन्ट्री अन् कर्णधारपद हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला. 

टॅग्स :हार्दिक पांड्याआयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स