Join us  

Rahul Dravid on Virat 100th Test : "अभिमान वाटावा अशी ही कामगिरी!", विराट कोहलीच्या १००व्या कसोटीवर राहुल द्रविडचे गौरोद्गार

Rahul Dravid on Virat 100th Test : भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणारी कसोटी ही भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 11:12 AM

Open in App

Rahul Dravid on Virat 100th Test : भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणारी कसोटी ही भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक आहे. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो १२वा खेळाडू ठरणार आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनील कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा यांच्यानंतर आता विराट कोहली १०० कसोटी सामना खेळणारा भारतीय ठरणार आहे. बीसीसीआयने बुधवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आदी दिग्गजांनी विराटच्या १००व्या कसोटी प्रवासाबद्दल आपापले मत मांडले. त्यात आज माजी कर्णधार व सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानेही मत मांडले. विराट कोहलीला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहे, असे मत द्रविडने व्यक्त केले.

२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत  ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.  कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत. 

'' हा असा टप्पा आहे की ज्याचा विराट कोहलीला अभिमान वाटायला हवा. त्याच्यावर दडपणाचे ओझे नेहमी असते आणि त्याच्याकडून अनेकांना बऱ्याच अपेक्षा असतात. त्या अपेक्षांवर तो नेहमी खरा उतरला आहे. जगभरात त्याने आपल्या खेळाचा दबदबा गाजवला आहे. या यशस्वी वाटचालीनंतर तो १००वी कसोटी खेळणार आहे. भारतासाठी पुन्हा कुणीतरी १०० कसोटी खेळत असल्याचे पाहून आनंद होतोय. तो या मानाचा हकदार आहे. त्याने यासाठी अथक मेहनत घेतली आहे. हा पल्ला गाठणं सोप नक्कीच नाही,'' असे मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले.

सौरव गांगुली काय म्हणाला?

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनेही ११३ कसोटी सामने खेळले आहेत आणि विराटचे या पंक्तित त्याने स्वागत केले. तो म्हणाला,''हा पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला खूप चांगले खेळाडू असणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोकांनी १०० कसोटी सामने खेळले आहेत. तो एक विलक्षण लँडमार्क आहे. विराट हा महान खेळाडू आहे आणि तो यासाठी पात्र आहे.'' 

''मी त्याच्याबरोबर खेळलो नाही. पण मी नेहमीच त्याचा खेळ फॉलो केला आहे.  मी नेहमीच त्याच्या क्रिकेटचा मागोवा घेतला आहे. त्याची कारकीर्द कधीपासून सुरू झाली आणि काही वर्षांनी त्याला वेगळे वळण कसे मिळाले, हे मी सर्व पाहिले आहे. त्याचे तंत्र, त्याची सकारात्मकता, त्याचे फूटवर्क, त्याचा तोल… मला हे सर्व आवडते,''असे गांगुली म्हणाला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीराहुल द्रविड
Open in App