Join us  

पाकिस्तानने जय शाह यांच्याशी घेतला 'पंगा'; ICC अध्यक्ष होण्याआधीच केली 'नापाक' करामत

Jay Shah vs Pakistan Cricket: पाकिस्तानच्या हट्टी धोरणामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीवरही होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 8:14 AM

Open in App

Jay Shah vs Pakistan Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष ( ICC Chairman ) म्हणून निवड करण्यात आली. ICC ने देखील नामांकनाच्या शेवटच्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी याची घोषणा केली. या पदासाठी जय शहा यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नव्हता. त्यामुळे शाह यांची बिनविरोध निवड झाली. या प्रकरणी जय शाह यांना आयसीसी बोर्डाच्या जवळपास सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळाला असला तरी पाकिस्तानने जय शाह यांच्या ICC अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच पंगा घेतला.

जय शाह यांना किती मते?

आयसीसीने गेल्या आठवड्यातच जाहीर केले होते की विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ नको आहे. त्यानंतरच आयसीसीने नवीन अध्यक्षांसाठी नामांकन मागवले होते, ज्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट होती. तेव्हापासून शाह स्वत: या पदासाठी दावा करणार असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. अखेर हेच घडले आणि त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. पण क्रिकेटनेक्स्टच्या अहवालात असे समोर आले आहे की आयसीसी बोर्डाच्या १६ पैकी १५ सदस्यांनी जय शाह यांच्या नामांकनाला पाठिंबा दिला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही जय शाह यांच्या बाजूने मतदान केले. पण पाकिस्तानने मात्र वेगळी भूमिका घेतली.

पाकिस्तानची 'नापाक' करामत

जय शहा यांच्या निवडीसाठी १६ पैकी केवळ ९ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. या सगळ्या दरम्यान, दुसरा कोणीही उमेदवार नाही हे माहीत असूनही केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाह यांना पाठिंबा दिला नाही. अहवालानुसार, पाकिस्तानने शाह यांच्या विरोधातही मतदान केले नाही. पाक क्रिकेट बोर्डाने तटस्थ राहणे पसंत केले.

चॅम्पियन्स ट्रॉफीवर परिणाम होणार

जय शाह १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अशा स्थितीत शाह यांना पाठिंबा न दिल्याने पाकिस्तानने त्यांच्याशी 'पंगा' घेतल्याची चर्चा सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, परंतु टीम इंडिया पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यास भाग पाडले जाईल आणि जय शहा यांच्या नेतृत्वाखाली आयसीसी त्यांची शेवटची आशाही धुळीस मिळवेल अशी चर्चा आहे.

 

 

टॅग्स :जय शाहआयसीसीबीसीसीआयपाकिस्तानऑफ द फिल्ड