Join us  

Sarfaraz Khan Amol Mazumdar: एका मुंबईकराचा दुसऱ्याला 'पनामा कॅप सॅल्युट'.. सरफराजच्या शतकाला कोच अमोल मजुमदारचा अनोखा सलाम

मुंबईचा संघ अडचणीत असताना सरफराजने ठोकलं दणदणीत शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 8:57 PM

Open in App

Sarfaraz Khan Amol Mazumdar Mumbai Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीविरुद्ध मुंबईसाठी मंगळवारी सरफराज खानने पुन्हा एकदा शतक झळकावले. हे शतक झळकावताच दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे, सर्फराज स्वतःची मूठ आवळून पॅव्हेलियनकडे पाहून आनंद साजरा करत गर्जना करताना दिसला. दुसरी घटना नेमकी त्याच वेळी दिसली जेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेले मुंबईचे प्रशिक्षक अमोल मजुमदार आपली पनामा कॅप काढून शतकाला सलाम करताना दिसले. यामागे काही भावनिक अर्थ असल्याचे म्हटले जात आहे.

मैदानावर घडलेल्या घटनेला भावनिक अर्थ?

सरफराज खानचे हे शतक सामान्य नव्हते. म्हणूनच अमोल मजुमदार यांनी केलेले हे अभिवादनही खास ठरले. रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या २३ डावांमधील सरफराजचे हे १०वे शतक होते. आजकाल क्रिकेट जगतात सरफराजबद्दल बरीच चर्चा होत आहे. एकेकाळी अमोल मजुमदारच्या बाबतीतही अशीच चर्चा असायची आणि एक-दोन वर्षे नाही तर अनेक दशके अमोल मजुमदार दमदार धावा करणारा खेळाडू होता. पण तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला, त्याला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच अमोल मजुमदार यांचे हे 'पनामा कॅप सॅल्युट' ही सरफराज खानच्या या गर्जनेत दडलेली वेदना जाणवत असल्यासारखे काहींनी म्हटल्याचे दिसले. कारण सरफराज खानदेखील अनेक वर्षे चांगले क्रिकेट खेळत असून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने ही गोष्ट प्रामुख्याने जाणवल्याचे नेटकरी व क्रिकेट जाणकार म्हणत असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले.

अमोल मजुमदार सध्या मुंबईचे प्रशिक्षक आहेत. मजुमदार यांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, मजुमदार यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत १७१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. १९९४ साली मुंबई संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मजुमदारने आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने ११ हजार १६७ धावा केल्या. मजुमदार यांनी २००६-०७ मध्ये मुंबई रणजी संघाचे कर्णधारपदही भूषवले.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा अमोल मजुमदार हा दुसरा फलंदाज आहे. त्याने आंध्र संघासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्राविरुद्ध शेवटचा सामना खेळला. सप्टेंबर २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम पाहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ते अनेक संघांचे प्रशिक्षक आहेत. सध्या तो मुंबई संघाचा प्रशिक्षक असून या रणजी स्पर्धेत तो खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहे.

टॅग्स :रणजी करंडकमुंबईसोशल मीडिया
Open in App