Join us  

Team India Qualification Scenario, Women's T20 World Cup 2024: पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित

Team India Qualification Scenario, Women's T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत होऊनही भारतीय महिला संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. कशी ते जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:57 AM

Open in App

Team India Qualification Scenario, Women's T20 World Cup 2024: महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या ९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला २० षटकात ९ बाद १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यातील पराभवामुळे भारताला उपांत्य फेरी गाठणे बरेच अवघड होऊन बसले आहे. पण अद्याप या गटातील एक सामना शिल्लक असून भारताची उपांत्या फेरीतील समावेश आता पाकिस्तानी संघाच्या हातात आहे. हे समीकरण नक्की कसे आहे, जाणून घेऊया.

काय आहे समीकरण?

भारतीय संघाला उपांत्य फेरीत आपली जागा पक्की करण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजयाची आवश्यकता होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे सध्या भारतीय संघ ४ सामने खेळून २ विजयांसह ४ गुणांवर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाने ४ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या जरी दुसऱ्या स्थानी असली तरीही आता भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. त्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर पाकिस्तानच्या भरवशावर वाट पाहावी लागणार आहे.

पाकिस्तान भारताची मदत करु शकतो?

साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. न्यूझीलंडचे ३ सामन्यात ४ गुण आहेत तर पाकिस्तानचे ३ सामन्यात २ गुण आहेत. अशा परिस्थितीत सर्वप्रथम पाकिस्तानला न्यूझीलंड विरूद्धचा सामना जिंकावा लागेल. पाकिस्तान जिंकल्यास तीनही संघांचे ४ गुण होतील. पण जर न्यूझीलंडने सामना जिंकला तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकत्र स्पर्धेबाहेर जातील.

पाकिस्तानला केवळ विजय पुरेसा नाही तर...

तसेच, पाकिस्तानच्या संघाने केवळ विजय मिळवणे त्यांच्यासाठी किंवा भारतासाठी पुरेसे ठरणार नाही. पाकिस्तानच्या विजयानंतर खेळ नेट रनरेटचा असेल. जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा कमी फरकाने पराभव केला तर नेट रनरेटच्या आधारवर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल.

पाकिस्तानलाही सेमीफायनलची संधी

पाकिस्तानी संघ भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवून देऊ शकेल, त्याचप्रमाणे स्पर्धेतून बाहेरदेखील करू शकेल. पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करून सामना ४७ ते ६० धावांनी जिंकला किंवा मिळालेले आव्हान १० षटकांपेक्षा कमीत पार केले तर पाकिस्तानचा संघ नेट रनरेटमध्ये भारतालाही मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर जाईल आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024महिला टी-२० क्रिकेटभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानन्यूझीलंडआॅस्ट्रेलिया