Join us  

पाकिस्तानच्या इंझमामने उधळली मुक्ताफळं, म्हणे- भारतीय गोलंदाज करतात चेंडूशी छेडछाड!

Pakistan Inzamam Ul Haq vs Team India bowlers, T20 world cup 2024: अर्शदीप सिंगच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवरून केले बिनबुडाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:17 PM

Open in App

Pakistan Inzamam Ul Haq vs Team India bowlers, T20 world cup 2024: पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हक याने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्शदीप १५व्या षटकात रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करत होता, हे कसे काय शक्य आहे, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. इंझमामने एक विचित्र दावाही केला आहे. अर्शदीप सिंग आणि इतर भारतीय वेगवान गोलंदाज २०२४ टी२० वर्ल्डमध्ये सतत चेंडूशी छेडछाड करत आहेत आणि त्यामुळेच त्यांना रिव्हर्स स्विंग मिळत आहे. भारताचे गोलंदाज चेंडू सारखा बदलत आहेत, असा दावा इंझमामने केला आहे.

इंझमाम आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक हे दोघे पाकिस्तानी न्यूज चॅनल 24 न्यूज एचडीच्या कार्यक्रमादरम्यान, २४ जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या भारताच्या सुपर 8 सामन्यात अर्शदीपच्या रिव्हर्स स्विंग बॉलिंगबाबच प्रश्न उपस्थित करताना दिसले. या दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी असा दावा केला की, वेगवान गोलंदाजाला चेंडूवर रिव्हर्स स्विंग मिळण्यासाठी खेळाचे १४वे किंवा १५वे षटक थोडेसे लवकर होत आहे. इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग मिळवता येत नाही. पाकिस्तानी गोलंदाजांनी हे केले असते तर आतापर्यंत गदारोळ झाला असता, असेही ते म्हणाले. इंझमाम टीव्ही शोमध्ये म्हणाला - अर्शदीप जेव्हा 15 वे ओव्हर टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. हे खूप लवकर घडले. याचाच अर्थ १२व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी सक्षम झाला होता. आता पंचांनी डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. चेंडू रिव्हर्स स्विंग कसा आणि केव्हा होतो याची आम्हाला माहिती आहे. जर अर्शदीप सिंगला १५व्या षटकात रिव्हर्स स्विंग मिळत असेल तर याचा अर्थ चेंडूशी काहीतरी छेडछाड केली गेली आहे.

सलीम मलिकनेही इंझमामच्या या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि म्हणाला, 'मी नेहमी म्हणतो की जेव्हा काही संघांचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्या कृत्याकडे कानाडोळा केला जातो आणि भारत अशा संघांपैकी एक आहे, असा दावा त्याने केला.

दरम्यान, वनडे विश्वचषकामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची गोलंदाजी पाहून पाकिस्तानींना हेवा वाटला होता. त्यापैकी एक माजी पाकिस्तानी खेळाडू हसन रझाने हद्दच केली होती. त्याने आरोप केला होता की, कदाचित भारतीय गोलंदाजांना इतर संघांपेक्षा वेगळा खास चेंडू दिला जात आहे, त्यामुळेच ते इतकी चांगली कामगिरी करत आहेत. यानंतर वसीम अक्रमनेच रझाला खडसावले होते.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघअर्शदीप सिंगजसप्रित बुमराह