स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं राजकोटच्या मैदानात रंगललेल्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय नोंदवत नव्या वर्षाची सुरुवात ही दमदार विजयासह केली आहे. आयर्लंडच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित ५० षटकात ७ बाद २३८ धावा करत भारतीय महिला संघासमोर २३९ धावांचे लक्ष ठेवले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सलामीची बॅटर प्रतिका रावल हिने ९६ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. तिच्याशिवाय तेजलनं ४६ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. या दोघींच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघानं पहिला वनडे सामना ६ विकेट्स राखून जिंकला. यासह भारतीय महिला संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयर्लंडकडून कॅप्टन गॅबीसह लेह पॉलची अर्धशतकी खेळी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात आयर्लंड महिला संघाची कॅप्टन गॅबी लुईस हिने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एका बाजूनं विकेट्स पडत असताना आपला निर्णय सार्थ करण्यासाठी ती मैदानात टिकून राहिला. तिने १२९ चेंडूत १५ चौकाराच्या मदतीने ९२ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय आयर्लंडच्या ताफ्यातील लेह पॉल हिने ७३ चेंडूत केलेल्या ५९ धावांच्या जोरावर आयर्लंडच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ बाद२३८ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून प्रिया मिश्रा हिने सर्वाधिक २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवा. तितासा साधू, सायली सातघरे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.
स्मृतीच्या स्फोटक खेळीनंतर युवा छोरींचा जलवा, प्रतिका रावलसह तेलजची दमदार फिफ्टी
आयर्लंडनं सेट केलेल्या २३९ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना कार्यवाहू कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. १० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मृती बाद झाली अन् ही भागीदारी फुटली. स्मृतीनं २९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४१ धावांचे योगदान दिले. हरलीन देओल २० (३२), जेमिमा रॉड्रिग्स ९ (६) धावांवर बाद झाल्या. प्रतिकारावल हिने ९६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८९ धावांची दमदार खेळी केली. या युवा छोरीशिवाय तेजल हसबनीसच्या भात्यातून पहिली फिफ्टी आली. तिने ४६ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला रिचा घोषनं २ चेंडूवर २ खणखणीत चौकार मारत संघालाविजय मिळवून दिला.