Join us  

Prithvi Shawने मोडला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३४ वर्ष जूना विक्रम, यशस्वी जैस्वालनेही उचलला वाटा! Video

Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. पृथ्वी पहिल्या डावात भोपळ्यावर बाद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 6:53 PM

Open in App

Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर ३४६ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईच्या पहिल्या डावातील ३९३ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा डाव १८० धावांवर गडगडला. पहिल्या डावातील २१३ धावांच्या आघाडीत मुंबईने झटपट धावा जोडण्याचा प्रयत्न केला. कर्णधार पृथ्वी शॉ सुसाट सुटला... त्याने व यशस्वी जैस्वालने डावाची सुरुवात केली. पृथ्वीने आजच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. यशस्वीनेही या विक्रमात वाटा उचलला.

हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. पृथ्वी पहिल्या डावात भोपळ्यावर बाद झाला. शाम्स मुलानी ( ५०), सर्फराज खान ( ४०), सुवेध पारकर ( ३२) व तनुष कोटियन ( २२) यांनी धावसंख्येत हातभार लावला. उत्तर प्रदेशच्या करन शर्माने ( ४-४६), सौरभ कुमार ( ३-१०७) व यश दयाल ( २-५१) यांनी विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना अपयश आले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी व कोटियन यांच्या सुरेख माऱ्यासमोर उत्तर प्रदेशचे फलंदाज ढेपाळले. शिवम मावीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. सलामीवीर माधन कौशिकने ३८ , तर कर्णधार करन शर्माने २७ धावा केल्या. उत्तर प्रदेशचा पहिला डाव १८० धावांवर गडगडला. तुषार ( ३-३४), मोहित ( ३-३९) व कोटियन ( ३-३५) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात मुंबईसाठी कर्णधार पृथ्वीने दमदार सुरुवात केली. त्याने ७१ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा केल्या. मुंबईच्या फलकावर ६६ धावांपैकी ६४ धावा या पृथ्वीच्या होत्या. नॉन स्ट्राईकला असलेल्या यशस्वीने ५४ चेंडूंनंतर पहिली धाव घेतली अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबईने दिवसअखेर १ बाद १३३ धावा केल्या आहेत. यशस्वी ११४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर, तर अरमान जाफर ६७ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावांवर खेळतोय.

पृथ्वीने मोडला १८८८ सालचा विक्रम 

२१व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. मुंबईच्या ६६ धावांत पृथ्वीच्या ६४ धावा होत्या, तर जैस्वालने खातेही उघडले नव्हते. दोन धावा या लेग बायने आल्या होत्या. ६६ धावांच्या भागीदारीत पृथ्वीने ९६.९६ टक्क्यांचा वाटा उचलला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्धशतकी भागीदारीत उचललेला ही सर्वाधिक टक्केवारी ठरली. १८८८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्सी मॅकडोनेल व अॅलेक्स बॅनेर्मन यांनी ऑस्ट्रेलियन्स वि. नॉर्थ या लढतीत ८६ धावांची भागीदारी केली होती. त्यात मॅकडोनेलने ८२ धावा करून ९५.३४ टक्के वाटा उचलला होता.    

 

टॅग्स :पृथ्वी शॉरणजी करंडकमुंबईउत्तर प्रदेश
Open in App