मुंबई : भारत आणि पाकिस्तान या शेजाऱ्यांमधील राजकीय संबंध सुधारण्याची चिन्हे नाहीच, त्यामुळे उभय देशांमध्ये गेली कित्तेक वर्ष क्रिकेट मालिका झालेल्या नाही. पाकिस्तानविरुद्ध न खेळून भारतीय संघाला आतापर्यंत फार आर्थिक फटका बसलेला नाही, परंतु यापुढे तसे केल्यास भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. आयसीसी महिला वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे आणि त्याचा फटका त्यांना 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बसू शकतो. भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये थेट पात्रता मिळवणे अवघड होऊ शकते.
पाकिस्तानच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवून गुणतालिकेत क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 12 गुण झाले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे भारतीय महिला तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास त्यांना सहा गुणांचा फटका बसू शकतो आणि पाकिस्तानला आघाडी घेण्याची संधी मिळू शकते.