Join us  

IND vs NZ: "तो 'टॅलेंटेड' आहे म्हणून टीम इंडियात खेळतोय"; रोहित शर्माचा 'या' खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव

Rohit Sharma Press Conference, IND vs NZ 1t Test: जिंकण्यासाठी काय प्लॅन? Playing XI कोण असतील? या सर्व विषयांवरही रोहित शर्माने आजच्या पत्रकार परिषदेत संवाद साधला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 1:42 PM

Open in App

Rohit Sharma Pre Match Press Conference, IND vs NZ 1t Test: बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका २-० ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ उद्यापासून न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. WTC 2025 मध्ये अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण WTC 2025 च्या आधी ही भारताची मायदेशातली शेवटची कसोटी मालिका असणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंना मैदानात उतरवेल. याचदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर यशस्वी जैस्वालचे (  Yashasvi Jaiswal ) तोंडभरून कौतुक केले आहे.

...म्हणूनच तो संघात आहे!

"यशस्वी जैस्वाल हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. तो सर्व फॉरमॅटमध्ये खेळाच्या आणि वातावरणाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन उत्तम खेळ खेळतो. यशस्वी अजून नवीन आहे त्यामुळे त्याच्याबाबत अंदाज बांधणे थोडेसे कठीण आहे. पण एका उत्तम फलंदाजामध्ये जे गुण असायला हवेत, ते सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. तो विविध टप्पे पार करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. विविध आव्हाने पार करून तो यशस्वी झाला आहे. त्यामुळेच तो सध्या भारतीय संघात खेळताना दिसत आहे," असे रोहित म्हणाला.

Playing XI काय असेल?

"संघातील अंतिम ११ खेळाडू कोण असतील हे उद्याच ठरवले जाईल. हवामानाचा अंदाज घेऊन आणि पीचचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल. गेले दोन दिवस पावसामुळे पीच कव्हर करण्यात आले होते. त्यामुळे संघात तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे की दोन वेगवान गोलंदाज खेळवायचे याबाबत उद्याच निर्णय घेणे योग्य ठरेल. उद्या सामन्याच्या आधी मैदानात गेल्यावर Playing XI ची निवड करणे अधिक सोपे जाईल. त्यामुळे सध्या आम्ही आमचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत," असे रोहित शर्माने स्पष्ट केले.

आम्ही जिंकण्यासाठीच खेळतो!

"आजचा दिवस कसा जातो हे पाहून अनेक गोष्टींचे निर्णय करता येतील आणि मगच आम्ही खेळात कुठल्या मानसिकतेने उतरायचे याबाबतचा निर्णय घेऊ. कानपूर मध्ये आम्हाला दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेरच घालवावा लागला. असे असूनही आम्ही सामना जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि आम्ही सामना जिंकलो. इथे काय होईल आणि उद्या पाऊस पडेल की नाही याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. उद्या मैदानात गेल्यावरच आम्हाला याबद्दलचा अंदाज येईल आणि मग त्यानुसार आम्ही आमची भूमिका ठरवू, पण एक मात्र नक्की आम्ही प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळतो," असे रोहितने ठणकावून सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघयशस्वी जैस्वालन्यूझीलंड