Rohit Sharma on Tanush Kotian as R Ashwin Replacement, IND vs AUS 4th Test at MCG: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेत आणखी दोन सामने शिल्लक असताना, भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याने निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे उर्वरित दोन सामन्याआधी BCCI ने एका नवख्या फिरकीपटूला ऑस्ट्रेलियाला बोलावून घेतले आहे. तनुष कोटियन (Tanush Kotian) असे या खेळाडूचे नाव असून तो लवकरच संघात सामील होणार आहे. भारताकडे कुलदीप यादव, अक्षर पटेल यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू असतानाही तनुषला संघात का घेतले, याचे कारण कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले.
"हो तनुष कोटियन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आम्हाला लवकरात लवकर एखादा खेळाडू संघात हवा होता. तनुष गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियात खेळून गेला होता. त्याचा अनुभवही अगदी ताजा आहे. तो ऑस्ट्रेलियात खेळलेला आहे, त्याची कामगिरीही चांगली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गेल्या १-२ वर्षात स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सिडनीच्या पिचवर गरज पडल्यास आम्ही दोन फिरकीपटूंना संघात स्थान देऊ शकतो. अशा वेळी आम्हाला एका बॅक अप खेळाडू नितांत गरज आहे," असे रोहितने स्पष्टपणे सांगितले.
कुलदीप किंवा अक्षर का नाही?
"कुलदीप यादव अद्याप १०० टक्के फिट नाही. हार्निया सर्जरी झाल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. अक्षर पटेलचाही विचार झाला होता. पण तो नुकताच बाबा झाला आहे. त्यामुळे त्याला कुटुंबाला सोडून प्रवास करायचा नव्हता. अशा स्थितीत तनुष कोटियन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. गेल्या वर्षी मुंबईचा संघ रणजी ट्रॉफी जिंकली, त्यात तनुषचा मोठा वाटा होता. तसेच ऑलराऊंडर म्हणून तो खूप महत्त्वाचा आहे. अश्विनच्या जागी तो परफेक्ट आहे," असे सांगत रोहितने नव्या खेळाडूचे कौतुक केले.